सातारा – नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सर्वच बाबतीत जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत संघटनांच्या समन्वय समितीद्वारे प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बहिष्कार टाकल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी दिली.
जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना हे निवेदन देण्यात आले आहे. या कार्यक्रमात मदतनीसांना किंवा सुलभकांना कोणतेही मानधन नसल्याने शेवटी जबाबदारी शिक्षकांवर येणार असल्याने या कार्यक्रमाच्या सर्वच बाबीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिक्षण संचालक (योजना) यांच्याकडेही शिक्षक संघटनांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण आणि अन्य कार्यक्रमात शिक्षकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन समितीच्यावतीने चंद्रकांत यादव यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील 3 शिक्षकांना तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार होते. मात्र, या योजनेवर राज्यातील सर्वच संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादली जात असून समन्वय समितीने याला तीव्र विरोध केला असून सर्व संघटना ठाम असल्याची माहिती यादव यांनी दिली. दरम्यान, खंडाळा येथे गटशिक्षणाधिकारी सुजाता जाधव यांना चंद्रकांत यादव, तालुकाध्यक्ष पी. जी. भरगुडे, नवनाथ भरगुडे, संताजी सोनावणे, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष तानाजी यादव, विद्देश गाडे, सुनील मोहिते, अविनाश नेवसे, संतोष गोळे, विठ्ठल मोरे व त्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.