महागाई, पावसाअभावी बाजारात शुकशुकाट
बळीराजा हिरमुसलेला
वाल्हे – शेतकऱ्यांचा आवडता सण अशी ओळख असलेल्या बैल पोळा सणावर दुष्काळाचे सावट असून महागाई, पावसाची गैरहजेरीमुळे शेतकरी बांधव यंदा हिरमुसलेला आहे. पोळा उंबरठ्यावर आला असला तरी, शेतकरी आणि मजूर वर्गाच्या हातात पैसा नाही अन् कामही. त्यामुळे पोळा यावर्षी जेमतेमच साजरा होणार अशी स्थिती आहे.
पावसाची समाधानकारक हजेरीची वाट पाहण्यात पावसाचा हंगाम गेल्याने, तो आर्थिक खाईत लोटला गेला आहे; त्यामुळे पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा होणार की नाही अशी स्थिती आहे. पुरंदर तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. बागायती पिके वगळता अन्य पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे.
भाववाढीमुळे वर्दळीच्या बाजारपेठा रोडावल्या आहेत. बाजारपेठेत शुकशुकाटामुळे सणावेळी ग्रामीण भागातून विविध वस्तू खरेदीसाठी होणारी गर्दी दिसून येत नसल्याने व्यापारी वर्गात निराशा आहे. पुरणपोळीचा गोड घासही महागला आहे. बैलांच्या सजावटीसाठी आवश्यक विविध वस्तूंच्या दरातही वाढ झाली नसली तरी दुष्काळसदृश परिस्थिती, वाढती महागाईमुळे सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. सजावटीच्या वस्तूंना मागणी नसल्यामुळे भांडवल निघेल की नाही याची व्यापाऱ्यांना चिंता आहे.
शनिवारी हा सण सर्वत्र उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त शेतकरी आठवडाभर तयारी करून मोठ्या उत्साहात सण साजरा करतात. यंदा मात्र, शेतकरी पावसाअभावी चिंताक्रांत असून सण होणार की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सजावटींच्या वस्तूंना मागणी नाही
ट्रॅक्टर शेतीमुळे बैलांचे प्रमाण आधीच कमी झाले आहे. त्यांच्या किंमतीही लाखाच्या पुढे गेल्या आहेत. सर्व वस्तू महाग झाल्या आहेत. गाव परिसरात पाऊस नसल्याने बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंना मागणी नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
वस्तूंचे दर असे
लहान मोठे गोंडे 10 ते 50, शिंगांची पाते पितळी 450, गळ्यातील पितळी साखळी 800, मोरखी 20 ते 60, घुंगरू साखळी 60 ते 70, पायातील पैंजण 250, शिंगांची पाते प्लॅस्टिक 30, कंबरीपट्टा 550, फुगे 1 ते 10, बाशिंग 100 ते 250 रुपये असे दर आहेत, अशी माहिती व्यावसायिक संदीप पवार, माऊली पवार, अतुल शहा, अशोक राऊत यांनी सांगितले.
लम्पीतून बचावासाठी धावपळ
ग्रामीण भागात शेतकरी दुधाचा जोडधंदा करत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबात किमान दोन जर्सी गायी व शेळ्या सांभाळण्यात येतात. त्यामुळे वर्षांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आनंदात बैलपोळा सण साजरा करण्यात येतो. मात्र दोन वर्षांपासून “लम्पी’ या संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.