सातारा – अयोध्येमध्ये ज्या दिवशी बाबरी मशीद पाडली गेली त्याचा ढाचा पाडण्यात कोण आघाडीवर होते आणि कोणी शेपूट घातले होते हे सर्व ज्ञात आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडल्याचा आम्हाला अभिमान आहे ,असे छातीठोकपणे सांगितले होते. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा भाजपने शिवसेनेला शिकवू नये, अशी खरमरीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
कोरेगाव तालुक्यात आयोजित कार्यक्रमासाठी अंबादास वनवे सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. रविवारी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला आणि भाजपच्या राम मंदिराच्या संदर्भातील भूमिकेवर त्यांनी खरमरीत टीका केली.
ते पुढे म्हणाले, राम मंदिराचा मुद्दा भाजपने आम्हाला सांगू नये. राम मंदिर हे अयोध्यापुरते मर्यादित नाही संपूर्ण देशाचे मंदिर आहे तो जगाचा इतिहास आहे. शिवसेनेने यासंदर्भात सक्रिय भूमिका घेतली होती तर शेमफुल थिंग म्हणून असे कोण बोलणारे होते हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे भाजपने आपणच सर्व काही केले असे बोलू नये. शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील आणि आम्ही काळाराम मंदिरात जाऊन आरती करणार आहोत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जरांगे पाटील यांनी संविधानिक शब्द वापरावे अशी विनंती केली होती. त्याबाबत पत्रकारांनी छेडले असता दानवे म्हणाले, अजित दादांनी संविधान पाळा असे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे. जरांगे पाटील यांनी स्वीकारलेल्या भूमिकेचे अजितदादांनी कौतुक केले पाहिजे. या भूमिकेचा अजितदादांनी अवमान करू नये. मराठा समाजाला राज्य सरकारला आरक्षण द्यायचे आहे की समाजामध्ये भांडणे लावायचे आहेत हे त्यांनी ठरवावे. मराठा आरक्षणाला शिवसेनेचा सातत्याने पाठिंबा आहे, असा दावा त्यांनी केला.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना ठाकरे गटाची चाचपणी झाली आहे. आठ पंधरा दिवसांमध्ये बैठकीनंतर निर्णय होणार आहे. उमेदवारांचे चित्र चार आठवड्यामध्ये क्लियर होईल शिवसेना ही फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे. शिवसेना साताऱ्याची ही संपूर्ण महाराष्ट्राची आहे हे येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसून येईल, असे ते ठामपणे म्हणाले.
दावोस येथे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले, तेथील गुंतवणूकदार हे महाराष्ट्रातीलच आहेत. त्यांची गुंतवणूक फायदेशीर ठरणारी नाही उलट 40 ते 50 लोक सरकारी खर्चाने 30-35 कोटी रुपये खर्च करून परदेशात गेले आणि हात हलवत रिकाम्या हाती आले, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
आमचा विरोध ईव्हीएमला नाही, व्हीव्हीपॅटला आहे
ईव्हीएम मशीनला बुद्धीजीवी विरोध करत आहेत. त्याबाबत तुमचे काय मत आहे असे प्रश्न विचारला असता दानवे म्हणाले, ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅटला विरोध आहे. हे कंट्रोल होऊ शकते हे शास्त्रीयदृष्ट्या समोर आलेले आहे. त्यामुळे त्याला आम्ही विरोध करत आहोत. एवढे लोक विरोध करत असतील तर सरकारने या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे. आमचा विरोध ईव्हीएमला नाही तर व्हीव्हीपॅटला आहे, असे ते म्हणाले.