सातारा – कोयना पाणलोट क्षेत्रापलिकडील कांदाटी खोऱ्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी बांबूपासून उत्पादन करणारा उद्योग उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरी भागातील वाढते प्रदूषण पाहता शहरांमध्ये बांबू पार्क उभारण्यात येणार असल्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दरे (ता. महाबळेश्वर) येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते शनिवारी बांबू लागवड करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मूल्य समितीचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबूपासून अनेक उत्पादने घेऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा हाऊ शकतो. राज्यातील शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांबू लागवड करावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. बांबू शेतकऱ्यांसाठी बहुद्देशीय उपयोगी पीक असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “”शेतकऱ्यांना बांबू लागवडीतून जोडधंदा मिळावा म्हणून शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
ऊस लागवडीमधून साधारणतः हेक्टरी उत्पादन 100 टन व भाव प्रतिटन किमान 2500 मिळतो. तर बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन 100 टन व भाव प्रतिटन किमान 4000 मिळतो. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. तिसऱ्या वर्षापासून बांबूचे उत्पादन सुरू होते. जमिनीची धूप व जलसंवर्धन होते. कृषी अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी बांबूपासून इथेनॉल निर्मिती केली जाते. 1 हेक्टर ऊस लावला तर 2 कोटी लिटर पाणी लागते व 1 टन ऊस गाळला तर 80 लीटर इॅथेनॉल निघते. आणि 1 हेक्टर बांबू लावले तर 20 लाख लीटर पाणी लागते. 1 टन बांबू गाळला तर 400 लीटर इथेनॉल निघते. तसेच प्रति एकरी 40 टन उत्पादन मिळते. बांबू एका वर्षात 320 किलो ऑक्सिजन हवेत सोडत असतो. एक एकर क्षेत्रामधून सर्वसाधारण 60 टन ऑक्सिजन तयार होतो. त्याचप्रमाणे एक हेक्टर क्षेत्रामधून सर्वसाधारणपणे 200 टन इतका र्काबन डायऑक्साईड हवेतून बांबूव्दारे शोषला जातो. त्यामुळे बांबू लागवड केल्यास तापमान कमी करण्यासाठी मदत होणार आहे.”
कोयना जलाशयात जल पर्यटनास परवानगी
पर्यटन वाढीसाठी कोयना जलाशयामध्ये जल पर्यटनास परवानगी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुनावळे (ता. जावळी) येथे 45 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यामध्ये स्कूबा डायव्हिंग, पॅरा ग्लायडिंग, स्पीड बोट, साहसी जल क्रीडा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर पर्यटकांना मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिकांना गावातच रोजगार मिळणार आहे, असी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याबाबत माहिती दिली. त्यामुळे ग्रामीण जनतेला स्थानिक स्तरावर चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून यासाठी शासनस्तरावरून आवश्यक निधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले..