पाचगणी : दहा वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या जावळी तालुक्याच्या क्रीडांगणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून माजी अर्थ व शिक्षण सभापती अमित कदम यांनी दरे तांब गावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जावळी तालुक्याचा जागेअभावी जटील होऊन बसलेला क्रीडांगणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी अमित कदम यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
जावळीतील शाळकरी मुले अनवानी रस्त्यावर धावून आपल्या क्रीडा स्पर्धा पूर्ण करत अयल्याचे विदारक चित्र पाहयला मिळत आहे. कुडाळ येथे नियोजित जागेमध्ये अतिक्रमण असल्याने क्रीडांगण करण्यात बाधा येत आहे.
मात्र, तालुक्यात इतर ग्रामपंचायती जागा देण्यास तयार असून लवकरच ग्रामपंचायतीचा ठराव आपल्याकडे सादर करुन क्रीडांगणाचा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी यावेळी कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
क्रीडापटूंना न्याय मिळत नसल्याची सल कदम यांनी मुख्यमंत्र्याना बोलून दाखवली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दाखवत लवकरात लवकर क्रीडांगणाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी ग्वाही यावेळी दिली .