सातारा – रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित, नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी २०२४ ते मे २०२४ याकालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने जरे होणार आहे. या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दि. १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.
‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, ठाणे, नवी मुंबई, मुंबई येथे होणार आहे. स्पर्धेत विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार असून सातारा विभागाचे संपर्क प्रमुख म्हणून प्रा. डॉ. संदीप पाटील तर सहयोगी राजेश कुंभारदरे व शिरीष चिटणीस तर सहाय्यक म्हणून बाळकृष्ण शिंदे व आनंद कदम काम पाहत आहेत.
या सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विविध स्पर्धांची माहिती, नियामवली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सातारा केंद्राची प्राथमिक फेरी दि. २७ जानेवारी ते २९ जानेवारी या दरम्यान कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे या सर्व स्पर्धा होणार आहेत. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी बाळकृष्ण शिंदे ८६२४८६९६८८ आणि आनंद कदम ९०७५४७४८४७ यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, शाळा, संगीत विद्यालय, महाविद्यालय, हौशी संस्थां, विद्यापीठाच्या व इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.
यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी अश्या तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. १५ जानेवारी पासून प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे व त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी ४ दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे. व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना १०० व्या नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागरमधून मिळणार आहे.