सरपंच सर्जेराव खेडकर यांची मागणी
रांजणगाव गणपती – चासकमान पाटबंधारे शाखा शिक्रापूर शाखा क्रमांक २ चे पाणी चासकमान डाव्या कालव्यामधून कोंढापुरी तलावामध्ये रांजणगाव गणपती नळपाणी पुरवठा योजनेसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी सरपंच सर्जेराव खेडकर यांनी निवेदनाद्वारे शाखाधिकारी चासकमान पाटबंधारे शाखा शिक्रापूर शाखा क्रमांक २ यांच्याकडे केली आहे.
रांजणगाव गणपती हे अष्टविनायक तीर्थ क्षेत्रांपैकी एक आहे. औद्योगीकरणामुळे या परिसारातील नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून सद्याची लोकसंख्या अंदाजे ३५००० च्या आसपास आहे. त्यामुळे प्रतिदिन दरडोई ५५ लिटरप्रमाणे १९२५००० लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
इतक्या मोठ्या लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी ग्रामपंचायत रांजणगाव गणपतीने महाराष्ट्र शासनाचे विशेष प्रयत्नातून अंदाजे २० कोटीची पाणीपुरवठा योजना कोंढापुरी तलावातून केलेली आहे,
परंतु सद्या कोंढापुरी तलावातील पाणीसाठा कमी प्रमाणात राहिलेला आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यासाठी पुरेल इतका पाणीसाठा कोंढापुरी तलावामध्ये सोडण्यात यावा, अशी मागणी सरपंच खेडकर यांनी केली आहे.