मंचर -मंचर गाव पुन्हा करोनामुक्त झाल्यावर 79 दिवसांनी गुरुवारी (दि.11) मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे आपल्या घरी परतले. दि. 25 मार्चपासून घरदार सोडून करोना महामारीविरुद्ध लढत गावाची दिवसरात्र सेवा करणारे सरपंच गांजाळे यांच्या कार्याचे कौतुक शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
आढळराव पाटील म्हणाले की, सरपंच दत्ता गांजाळे यांनी मंचरमध्ये करोनाविरुद्ध किंवा करोना होऊ नये म्हणून राबविलेले उपक्रम अत्यंत प्रभावशाली होते. ते वैद्यकीय क्षेत्राशी निगडित होते. कुटुंबापासून 79 दिवस दूर राहून मंचर ग्रामपंचायत कार्यालयात निवासी होते. संपूर्ण मंचर शहर हेच आपले कुटुंब मानून अविरत कार्यरत राहिले. शहराचे निर्जंतुकीकरण करणे, लॉकडाउनमध्ये घरपोच सेवा देणे, शहरातील सर्व नागरिक व व्यावसायिक यांना एकत्र करून त्यांच्या समवेत चर्चा करून नागरिकांना त्रास न होता योग्य वेळेत त्यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे, दर शनिवारी व रविवारी संपूर्ण मंचर शहर बंद ठेवणे, व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची तापमान तपासणी.
घरपोच भाजीपाला, हातावर पोट आहे त्यांना सहकार्य, जेवणाची सोय नाही त्यांना मोफत शिवभोजन देणे, प्रत्येक कुटुंबास आवाहन करून एका व्यक्तीचा जास्त स्वयंपाक करून गरजवंतास देणे, रेशनचे धान्य गोळा करून गरजवंतांना देणे, लॉकडाऊनमध्ये पायी किंवा गाडीवर आपल्या गावी जाणाऱ्या लोकांना थांबवून त्यांना नाष्टा देणे, त्यांचा अपघात होऊ नये म्हणून जॅकेट दिले. मुंबईतून मंचरला आलेली गर्भवतीस जी पॉझिटिव्ह आहे त्यांना योग्य उपचार मिळतील यासाठी गांजाळे यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.
“त्या’ बाळाची शैक्षणिक जबाबदारीही स्वीकारली
मंचर येथे मुंबईहून आलेल्या गरोदर महिलेला करोनाची लागण झाली होती. तिला उपचारासाठी पुणे येथे दाखल केले होते. या महिलेस कन्यारत्न प्राप्त झाले. ही महिला रुग्णालयात असल्याने बाळाचा सांभाळ काहीकाळ ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी केला. यामुळे छोट्या कोविड योद्ध्याचा सन्मान म्हणून आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी या बाळाची सर्व शैक्षणिक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.