शहडोल : मध्य प्रदेशात खाण खचल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर अजून मातीच्या ढिगाऱ्याखाली 10 कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्याच्या पपरेडी गावात घडली. या खाणीतून येथील स्थानिक नागरीक चुनखडी काढत असताना माती खचल्याने ते गाडले गेले. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती बोहारी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार पटेल यांनी दिली. या अपघातानंतर खाण क्षेत्र बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मृताच्या कुटुंबियांना 5 हजार रुपयांची तातडीने मदत देण्यात आली आहे.