पुणे -‘ब्रेनस्ट्रोक’ हे देशातील मृत्यूचे दुसरे सर्वांत मोठे कारण आहे. पण, तरी याला प्रतिबंध करता येऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नियमित तपासणी आणि सुरुवातीची लक्षणे ओळखल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. ‘जागतिक स्ट्रोक ऑर्गनायझेशन’तर्फे 29 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक स्ट्रोक दिन’ म्हणून पाळला जातो आणि त्याविषयी जागरूकता निर्माण केली जाते.
साखरेची पातळी, रक्तदाब, कोलेस्टेरॉलची पातळी तपासणे आणि अनुवांशिक घटकांचा शोध घेणे यासारख्या नियमित आरोग्य तपासणीने हे मृत्यू टाळता येऊ शकतात. ‘ब्रेनस्ट्रोक’ कोणालाही होऊ शकतो. अशावेळी “गोल्डनअवर’मध्ये रुग्णालयात जाणे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्ट्रोकच्या लक्षणांच्या सुरुवातीपासूनचा “सुवर्णकाळ’ सुमारे 4-5 तासांचा असतो. एखादी व्यक्ती या कालावधीत हॉस्पिटलमध्ये पोहचू शकली, तर आम्ही त्या व्यक्तीला वाचवू शकतो, असे सिटी न्यूरॉलॉजिस्ट डॉ. संदीप बोरसे यांनी सांगितले.
स्ट्रोकनंतरच्या गुंतागुंतांमुळे भारतीयांमध्ये उच्च मृत्युदर असूनही, या समस्येबद्दल जागरूकता कमी आहे. त्यामुळे त्याविषयी लगेचच उपचार होऊ शकत नाहीत. चार पैकी एक पेक्षा कमी भारतीयांना स्ट्रोक आणि त्याची लक्षणे याबद्दल माहिती आहे असे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
‘ब्रेनस्ट्रोक’ म्हणजे काय?
जेव्हा एखादी गोष्ट मेंदूच्या भागाला रक्तपुरवठा रोखते किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटते तेव्हा “स्ट्रोक’ होतो. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये शरीराच्या प्रणालीमध्ये अचानक बदल होणे, ते अंगात, न्यूरोलॉजिकल बदल किंवा गोंधळ किंवा बोलण्यात अडचण असू शकते. शरीराच्या प्रणालीमध्ये अचानक होणारा कोणताही बदल स्ट्रोक दर्शवू शकतो.
‘ब्रेनस्ट्रोक’ बद्दल महत्त्वाची निरीक्षणे
- एका अभ्यासानुसार दर चार मिनिटांनी ब्रेनस्ट्रोकमुळे एक मृत्यू नोंदवला जातो.
- उच्च रक्तदाब, मद्यपान, धूम्रपान, लठ्ठपणा आणि प्रदूषण ही “ब्रेनस्ट्रोक’ची कारणे
- पहिल्या चार ते पाच तासांत योग्य उपचार झाल्यास मृत्यू टाळता येऊ शकतात.
- स्ट्रोकनंतरचे पुनर्वसन हा महत्त्वाचा घटक आहे. यात शारीरिक थेरपी, संतुलन सुधारणे आणि सामर्थ्य
- वाढवणे,स्वयंपाक, जेवण, आंघोळ ही दैनंदिन कामे करता येणे, स्पीच यांचा समावेश असू शकतो.
“मेंदूच्या पेशी एकदा मृत झाल्या, की त्या पेशी पुन्हा जिवंत करू शकतील असे कोणतेही औषध आज उपलब्ध नाही. एकदा मृत झाल्यावर संपूर्ण उपचार हे केवळ पुनर्वसनाकडेच असते.”- डॉ. सुशील पाटकर, न्यूरोसर्जन