मुंबई – 2019साली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार होण्यासाठी हालचाली वाढल्या होत्या. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहाटे शपथ घेत काही तासांच सरकार स्थापन केले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सरकार स्थापन झाले होते, असे विधान त्यांनी केले आहे.
या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना आपल मत मांडलं आहे. ते म्हणाले,’देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहे. दोन दिल्लीत बसलेत, शरद पवार यांच्याशी बोलून पहाटेचा शपथविधी झाला असता, तर नक्कीच सरकार चाललं असतं. ते सरकार ७२ तासात कोसळलं नसतं. देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी काय बोलू. अलीकडे त्यांचे वक्तव्ये पाहतोय’. असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे,
तत्पूर्वी, एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्थिर सरकार हवे आहे, म्हणून आपण सरकार तयार करू. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला.’ आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर सर्व गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता, असे फडणवीस म्हणाले होते.