मुंबई – शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहेत. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. राऊत यांनी मात्र आपण कोणताही गैरव्यवहार केला नसून आपल्यावर करण्यात येत असलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप केला आहे. अशातच संजय राऊत यांनी त्यांच्या आई सविता राऊत यांना एक भावनिक पत्र लिहले आहे. संजय राऊत यांच्या अधिकृत खात्यावर ८ ऑगस्टला लिहलेलं हे पत्र पोस्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान या पत्रावरून राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. अशातच याच पत्रावरून भाजपा नेते गिरीश महाजन यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांच्या पत्रावर भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’त्यांनी पत्र लिहिलं पाहिजे, त्यात काही हरकत नाही. भेट घेण्याची मागणी केली तर त्यांना भेटताही येईल. त्यांची भेट झाली तरी काही हरकत नाही. त्यांच्या आईच्या प्रकृतीबद्दल मला फारशी माहिती नाही. पण त्या भेटायला जाऊ शकतात. पत्रात काय लिहावं हा त्यांचा प्रश्न आहे.’
ते पुढे म्हणाले,’जेलमध्ये गेल्यावर भावना उफाळून येत असतात. सगळ्याच आरोपींच्या बाबतीत आपण हे पाहिलं आहे. तसंत त्यांनीही मत व्यक्त केलं असेल” असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.