मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी बंडखोर आमदारांचा उल्लेख “जिवंत प्रेतं” असा केला होता. त्या विधानावर जोरदार आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत. तथापि राऊत यांनी आपल्या विधानाचे आज पत्रकारांशी बोलताना समर्थनच केले आहे. त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रात असे बोलण्याची पद्धत आहे. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहींत पण आपल्याकडे असा शब्दप्रयोग सर्रास वापरला जातो त्यात चुकीचे काहीं नाही असे त्यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, त्यांचे शरीर जिवंत आहे, पण त्यांचा आत्मा मेला आहे, ही महाराष्ट्रात बोलण्याची पद्धत आहे. मी काय चुकीचे बोललो? जे अनेक वर्षे पक्षात राहून पळून जातात, त्यांचे आत्मे मेले आहेत, त्यांच्यात काहीही उरले नाही, या डॉ राम मनोहर लोहिया यांनी सांगितलेल्या ओळी आहेत. मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या, मी फक्त सत्य बोललो असे ते म्हणाले.
मी गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यात ते वडील बदलणाऱ्यांबद्दल बोलत आहेत. त्यांनी जे सांगितले ते गुवाहाटीत बसलेल्या सर्वांसाठी योग्य आहे. माझे ट्विट गुवाहाटीमध्ये बसलेल्या लोकांसाठी आहे. पाटील यांनी म्हटले आहे की लोक खातात, पितात आणि पार्टीचा आनंद घेतात आणि नंतर त्यांचे वडील बदलतात, आम्ही त्यांच्यासारखे नाही, असे राऊत यांनी यावेळी नमूद केले.