मुंबई – “तुम्ही आम्हाला मिलावट राम म्हणतात, तुमची सडलेली भेळपुरी झाली आहे, तुम्ही आम्हाला समाजवाद काय शिकवणार?’ असा सवाल उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. ज्यांना बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी ठाकरे गटावर हल्ला चढवला होता. याला ठाकरे गटाचे नेते राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे न राहता मोदीमय झाल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांना समाजवाद (Samajwadi) हा शब्द तरी माहीत आहे का? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला. त्यांना बाळासाहेब आणि समाजवादी नेते यांचे काय संबंध होते ते विचारा. त्यांना विचारा नाथ पै यांचे नाव ऐकले आहे का? मधु दंडवते यांच नाव माहीत आहे का? ज्या ठाण्यातून ते येतात त्या भागात जास्त समाजवादी लोक राहतात. भाजपच्या पदराखाली बसले आहेत त्यांना सत्ता देण्याचे काम हे समाजवादी नेत्यांनी केले असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये क्रिकेट सामन्याला हरकत नाही. मात्र, तिथे पाकिस्तानी खेळाडूंवर फुलांची उधळण झाली. ती कुठेच किंवा कोणत्याच राज्यात झालेले नाही. ते योद्धे आल्यासारखं अहमदाबादच्या स्टेडीअममध्ये फुले उधळण्यात आली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. असा प्रकार इतर राज्यात झाला असता तर भाजप नेत्यांनी थयथयाट केला असता, असा टोलाही त्यांनी लागावला.