Sanjay Raut on Manohar Joshi। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. आज पहाटे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ॲडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना मनोहर जोशींच्या निधनावर शोक व्यक्त केला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना संजय राऊत यांनी शून्यातून विश्व निर्माण करणारे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक हरपला असे भावोद्गार त्यांनी काढले. यावेळी बोलताना, “मनोहर जोशींना आम्ही सर म्हणून संबोधायचो. तर बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत म्हणायचे. शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि महाराष्ट्र व मराठी माणसासाठी एक आदर्श असे ते व्यक्तिमत्व होते.
“उद्धव ठाकरे आणि मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना आम्हाला ही दुःखद बातमी समजली. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या प्रत्येक आंदोलनात मनोहर जोशी आघाडीवर होते. मुंबईमध्ये सीमाप्रश्नावर आंदोलन झाले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली. तेव्हा त्यांच्याबरोबर मनोहर जोशी होते “असे त्यांनी सांगितले.
शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून राहिले Sanjay Raut on Manohar Joshi।
तसेच ”शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून राहिले. त्यांनी नगरसेवक पदापासून ते मुंबईचे महापौर, विधानपरिषद आणि विधानसभेतील आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे मुख्यमंत्री, लोकसभेत गेल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्षपद अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा हा प्रवास झाला. त्यामुळे ते शेवटपर्यंत शिवसेनेचे ऋणी राहिले.”
पुढे त्यांनी, उत्तम वाचक, कडवट मराठी अभिमानी आणि यशस्वी उद्योजक असे गुण त्यांच्यात होते. मराठी माणसाने उद्योग कसा यशस्वी करून दाखवावा, याचे उदाहरण त्यांनी घालून दिले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम, हे आदर्शवत होते. जोशी शिक्षक असल्यामुळे त्यांनी संसदेचे कामही शिस्तीनुसार चालविले. त्यांना सर्व खासदार हेडमास्तर म्हणायचे. पक्षपात न करता संसद कशी चालवावी, हे त्यावेळी त्यांनी दाखवून दिले, असेही म्हटले.
ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री पद दिले म्हणून टीका पण… Sanjay Raut on Manohar Joshi।
दरम्यान, ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री पद दिले म्हणून त्यावेळी शिवसेनेवर टीका झाली. पण बाळासाहेबांनी कधीही कुणाची जात पाहून पद दिले नाही. कर्तबागारी आणि कर्तुत्व पाहूनच पद दिले. मनोहर जोशींनीही मुख्यमंत्री म्हणून आपले कर्तव्य पार पाडले. बाळासाहेबांची विकासासंबंधी जे स्वप्न होते, ते त्यांनी पूर्ण केले. कश्मीरी पंडितांवर जेव्हा काश्मीरमध्ये अत्याचार होत होते, तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या जोशींना काश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देऊ केले होते, असे करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते.