जम्मू-काश्मिर – उद्या जाऊन हे ज्यो बायडेन यांचा पक्षही फोडतील, अशी मिश्किल टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली. कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत खासदार राऊत सहभागी झाले होते. त्यानंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शिवसेना फुटीवर प्रश्न विचारण्यात आला होता.
शिवसेना ही एकच आहे. दुसरी शिवसेना होऊ शकत नाही. काही खासदार व आमदार फुटले म्हणून शिवसेना संपत नाही. शिवसेना जमीनीवर आहे. गेले तीन ते चार महिने निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. त्यावर निकाल लागत नाही. याबाबत दबाव तंत्र वापरले जात आहे.
उद्वव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात निर्णय दिलेला नाही. यावर राऊत म्हणाले, बाळासाहेब हे शिवसेना प्रमुख होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ते पद कायम ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत व तेच राहतील, असा दावा त्यांनी केला.
जम्मूतही निवडणूक लढणार
शिवसेना जम्मू-काश्मिरमधीलही निवडणूक लढवणार आहे. आमचा जाहिरनामा नसतो. आमचा वचननामा असतो. येथील तरुणांना रोजगार देण्यासाठी व अन्य मुळ प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना तत्पर असेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गेली पंधरा ते वीस वर्षे जम्मू-काश्मिरमधील ज्वलंत प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही. काश्मिरी पंडीत, येथील विस्थापीत, निर्वासित यांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. घर वापसी होणार होती. कुठे झाली घर वापसी. काश्मिरच्या मुद्द्यावर भाजपने मते मागितली. निवडून आल्यानंतर काश्मिरचे प्रश्न काही भाजपने सोडवले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.