मुंबई, – दिवाळी असली काय नसली काय, आतषबाजी कमी आणि फटाकेच जास्त फुटत असतात. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके तर 365 दिवस फुटत असतात. करोनाचे निर्बंध कमी झाल्यामुळे या वेळची दिवाळी मोकळ्या वातावरणात साजरी होईल; पण सण साजरे करावे असे वातावरण आज खरेच आहे काय? महागाईचा भडका उत्सवांचा उत्साह जाळून टाकीत आहे. त्या आगीत सत्ताधाऱ्यांच्या जळजळीत वक्तव्यांची भर पडत आहे. महागाई टोकाची आहे. ती कमी करता येत नसेल तर होरपळणाऱ्या जनतेच्या जखमांवर मीठ तरी चोळू नका, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
संजय राऊत यांनी मोफत लसीकरणामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढले म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या मंत्र्यालाही चांगलेच फटकारले. ते म्हणाले, रामेश्वर तेली हे पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यांना पत्रकारांनी विचारले, साहेब, पेट्रोल-डिझेलमुळे लोकांचे जगणे कठीण झाले. काहीतरी करा! यावर मंत्री महोदय काय सांगतात, मोदींनी देशभरात मोफत करोना लसीची पूर्तता केल्यानं पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. म्हणजे मोफत लसीकरणाचा भार शेवटी जनतेच्याच माथी मारला जात आहे.
मग मोफत लसीकरणाची जाहिरात कोणाच्या पैशाने आणि का करीत आहात, हा प्रश्न देशाला पडला आहे. आता सत्य असे आहे की, संपूर्ण देशातील लसीकरणाचा खर्च 67,113 कोटी इतका दाखवला आहे. पण मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर’ लावून 25 लाख कोटींची वसुली आजपर्यंत केली आहे.
पुन्हा कोविडशी मुकाबला करण्यासाठी पीएम केअर फंड’ हे बिगर सरकारी खाते उघडून त्यात उद्योगपती, सरकारी उपक्रम यांच्या माध्यमातून लाखो-कोटी रुपये जमा केले ते वेगळेच. जनतेचे दिवाळे निघत आहे व राज्यकर्त्या पक्षाची ही अशी दिवाळी जोरात सुरू आहे. महागाईचे चटके कसे? तर इतक्या वर्षांत प्रथमच माचीस बॉक्स’देखील दुपटीने महागला.
एक रुपयांचा माचीस बॉक्स दोन रुपयांना झाला. रस्त्यावर जाता-येता सहज एक दुसऱ्याकडे माचीस आहे का?’ असे विचारून विडी-सिगारेट शिलगावली जात होती आणि माचीस सहज दिली जात होती, असं संजय राऊत यांनी सांगितले.