Sanjay Raut : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर आता त्यांच्यातील फुटीच्या प्रकरणाची सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी प्रलंबित आहे. शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)चार महिन्यांपूर्वी विधानसभा अध्यक्षांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही कार्यवाही न झाल्यामुळे महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांना सुनावत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून (Rahul Narvekar) योग्य ती पावलं उचलण्यात न आल्यामुळे आज न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी चांगलेच झापले आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत विधासभा अध्यक्षांच्या कामकाजावर बोट ठेवल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी, “72 तासात हे सरकार जाणार. 72 तास मी आधीही बोललो होतो आता वेळ आलीय”, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
तसेच “विधानसभा अध्यक्षांनी ICU मध्ये टाकून सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांनाच ICU मध्ये जाण्याची वेळ आली आहे. सौ सोनार की एक लोहार की असं आजचं न्यायालयाचे मत आहे. हातोडा मारला आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar) झाप झाप झापल्यानंतर आता ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकरांनी वेळकाढूपणा केल्याचा अप्रत्यक्ष ठपका सुप्रीम कोर्टाने ठेवला. शिवाय पोरखेळ लावलाय का अशा कडक शब्दात कोर्टाने नार्वेकरांना सुनावले.