नवी दिल्ली – बांगलादेशातील इस्कॉनच्या मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही तीव्र शब्दात निषेध केला आहे. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदू समुदायाचे रक्षण करण्यास शेख हसिना सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. म्हणून या प्रकरणामध्ये भारत सरकारने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी केली आहे.
इस्कॉन मंदिराची तोडफोड होण्याचा कॉंग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून निषेध करावा. हिंदूंवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी या संदर्भात भारत सरकारकडून बांगलादेशावर आणण्यात येत असलेल्या दबावामध्ये सामील व्हावे, अशी मागणीही इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केली. हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांचा मुस्लिम समुदायानेही निषेध करावा, अशी मागणीही त्यांनी केली. इंद्रेश कुमार हे संघाच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संस्थापक आणि राष्ट्रीय समन्वयक आहेत.
बांगलादेशातील इस्कॉनच्या राधाकांत मंदिरावर गुरुवारी 200 जणांच्या जमावाने हल्ला करून मंदिराची तोडफोड केली होती. हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे इंद्रेश कुमार यांनी वृत्तसंस्थेला पाठवलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे.