संगमनेर – दरवर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने निमोण-तळेगाव पट्ट्यातील गावांना भोजापूर चारीद्वारे धरणाचे पाणी देण्यासाठी काम झाले आहे. यंदाही आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून भोजापूरच्या चारीला ओव्हर-फ्लोचे पाणी सोडण्यात आल्याने दुष्काळग्रस्त गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भोजापूर धरण हे निमोण परिसरातील गावांसाठी वरदान ठरले आहे. यंदा अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती आहे. यावर तातडीने उपाययोजना व्हावी याकरिता आ.थोरात यांनी निळवंडे धरणातून डाव्या कालव्याद्वारे तातडीने पाणी सोडावे अशी मागणी सरकारकडे केली होती. टंचाई आढावा बैठक घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व रोजगार हमीच्या कामांबाबत प्राधान्यक्रम द्यावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.
आ. थोरात यांचा सततचा पाठपुरावा व कार्यकर्त्यांची मागणी यामुळे प्रशासनावर दबाव येऊन धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने भोजापूर चारीला ओव्हर-फ्लोचे पाणी सुटले आहे. यामुळे सोनेवाडी, पळसखेडे, निमोण, कऱ्हे,पिंपळे, नान्नज या गावांबरोबरच उर्वरित गावांमध्येही ओव्हर-फ्लोचे पाणी येणार आहे. बी. आर. चकोर म्हणाले की, निमोण, तळेगाव परिसरातील गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आ. थोरात यांचा सातत्याने पाठपुरावा असून, त्यांनी कधीही प्रसिद्धी केली नाही. मात्र, काही लोक काम न करता प्रसिद्धी करतात, अशी टीका केली.