संगमनेर,(प्रतिनिधी) – निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत हाच निर्णय दिला होता. त्यांची निर्णय देण्याची पद्धत ही काही वेगळे नसून ते सांगण्याची गरज नाही. निवडणूक आयोग स्वायत्त आयोग आहे, परंतु हे सत्तेचे गुलाम झाले आहेत. लोकशाहीला अत्यंत घातक अशी प्रक्रिया सुरू झाल्याची टीका करत या सगळ्याविरोधात आपल्याला लढावे लागेल, असा इशारा माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी दिला.
काँग्रेस नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरात करण्यात आले. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रात्री झालेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
थोरात पुढे म्हणाले की, या निकालामुळे राष्ट्रवादीकडे वेगळं चिन्ह आलं तरी जनता भाजपला या कृत्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, याची खात्री आहे. याच ओघात देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान हे पद सर्व जनतेचे असते, याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. आपल्या उणिवा, चुका झाकण्यासाठी गांधी व नेहरुंना नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही. यातून ते आपण कसे चांगले आहोत, हे दर्शवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांचे हे वागणे देशाच्या लोकशाहीला घातक आहे
यावेळी उपस्थित असलेले अभिनेते, खासदार अमोल कोल्हे निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रीया देताना म्हणाले की, महाराष्ट्राला दिल्लीकडून होणारा दगा नवा नाही… तर ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. याबाबत जनता योग्य तो न्याय देईल याची खात्री आहे. आजचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून अशा गोष्टींमुळे लोकशाही प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या महाराष्ट्राला छ्त्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलाय…हम लढेंगे और जितेंगे.