वाई, (प्रतिनिधी) – काँग्रेसच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीपेक्षा मोदींची दहा वर्षातील देशाच्या विकासाची कामगिरी शंभर पट सरस आहे, असे उद्गार खा. उदयनराजे भोसले यांनी वाईतील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना काढले. वाईत सातारा लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते सातारा मतदार संघाचे उमेदवार म्हणून बोलत होते.
यावेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आ. मदन भोसले, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, महिला जिल्हा संघटक डॉ. सुरभिताई भोसले, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शारदाताई जाधव, उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास पिसाळ, तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र भिलारे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, देशाला विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर सक्षम पर्याय म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. देशात गेल्या दहा वर्षात अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले असून देश विकासाच्या प्रगतीवर पुढे जाताना दिसत आहे.
एक सक्षम पर्याय देशाला प्रगतीच्या दिशेने नेहण्यासाठी विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नेतृत्व मान्य करावे लागेल. ४०० पारचा मोदींचा संकल्प यशस्वी करण्यासाठी सातारा लोकसभा मतदार संघातून भाजपचा खासदार निवडून देण्याचा संकल्प येथील मतदारांनी घेतला आहे.
पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई म्हणाले, आपण महायुती म्हणून निवडणुकीस सामोरे जात आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुती देईल त्या उमेदवाराचे विजयासाठी ताकदीने काम करायचे आहे. केंद्राच्या अनेक योजनाचा समाजातील शेवटच्या घटकांना फायदा झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यापासून राज्याच्या विकासाला गती आली असून जिल्ह्यात ही मोठया प्रमाणात विकास काम चालू आहे.
जिल्ह्याच्या विकासात पालकमंत्री म्हणून समन्व्य साधन्याचे काम केले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी सरकार सदैव संवेदनशील आहे. लोकसभेची निवडणूक महत्वाची आहे. बूथ लेवलला जास्तीत-जास्त मतदान करून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा जगात गौरव वाढवला आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एक दिलाने काम करून सातारा मतदार संघातील खासदार उदयनराजे भोसले यांना विजयी करावयाचे आहे. ही निवडणुक देशाची धुरा कोणाच्या हातात द्यायची हे ठरवणारी आहे. त्यासाठी महायुतील सर्वच घटक पक्षांनी एकजुटीन काम करावयाचे आहे. यावेळी भाजपच्या महिला जिल्हा संघटक डॉ. सुरभी भोसले, माजी आ. मदन भोसले, शारदाताई जाधव, यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाबळेश्वर येथील जनसेवा फौंडेशनचे शुभम भिलारे यांनी पदाधिकाऱ्या समवेत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रास्ताविक प्रदीप माने यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले तर आभार विकास शिंदे यांनी मानले. महायुतीच्या मेळाव्याला वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातील भाजप, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
महायुतीच्या मेळाव्याला राष्ट्रवादीसह आरपीआयची दांडी
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ घेण्यात महायुतीच्या मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. राष्ट्रवादी आणि आरपीआय हे महायुतीचे घटक पक्ष असल्याने मेळाव्याला उपस्थिती दाखविणे अपेक्षित असताना राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील व आरपीआय चे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दांडी मारल्याने वेगळी चर्चा रंगली होती.