नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गास देण्यात आले. हा समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासासाठी गेमचेंजर ठरेल, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली होती. मात्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर पहिल्या 100 दिवसांत म्हणजेच 20 मार्च 2023 पर्यंत तब्बल 900 अपघात झाले आहेत. त्यात 31 जणांचा मृत्यू झाला आहे, असे महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे या मार्गावर आठ ठिकाणी समुपदेशन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
अशात मंगळवारी दि. १८ एप्रिलला दुपारी झालेल्या अपघातात भरधाव कार मालवाहू वाहनाला धडकून झालेल्या अपघातात नागपूरचे माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पत्नी जागीच ठार झाल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यावरून नागपुरला जात असलेली क्रेटा कार आयशरला धडकली. अपघातात प्रवीण हिंगणीकर जखमी झाले, तर त्यांची पत्नी जागीच दगावली आहे.
या अपघातात वाहनाचा चुराडा झाला आहे. प्रवीण हिंगणिकर यांना प्रारंभी मेहकर ग्रामीण रुग्णालय व नंतर खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्या हाता पायाला जखमा असून ते सुखरुप आहे.
तत्पूर्वी, अपघातांच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावणार असल्याची घोषणा केली होती. फडणवीस म्हणाले होते की, या महामार्गावर काही स्पॉट असे तयार झालेत की, जिथे अपघात होत आहेत. मुळात समृद्धी महामार्ग सरळ आहे. त्याला वळणे कमी आहेत. काही स्पॉटवर मध्यंतरी माकडांचा वावर होता. अशा स्पॉटची माहिती गोळा केली आहे. सुधारणा सुरू आहेत. त्याच्यावर इंटलिजेंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावत आहोत. त्यामुळे ओव्हर स्पीड, अपघात घडेल असा स्पॉट तयार झाला असेल, तर त्याची पूर्वसूचना देता येईल.