पिंपरी – जगण्यासाठी अन्न गरजेचे आहे आणि सध्यातरी अन्नाला काहीच पर्याय नाही. हे अन्न पिकविण्यासाठी आणि मानवजातीला जगविण्यासाठी शेतकरी ऊन, थंडी, पावसात दिवस-रात्र राबतो. परंतु मध्येच अचानक येणाऱ्या अवकाळी पावसाने त्याचे संपूर्ण कष्ट, गुतविलेला पैसा आणि भविष्यातील नियोजन नष्ट होते. गेल्या एक ते दोन वर्षात अवकाळी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महिन्यातून किमान एकदा तरी येणारा अवकाळी पाऊस बळीराजाला रडवतोय.
आर्थिक दृष्ट्या शेतकरी नामोहरम होत असल्याने आता पोटापाण्यापासून शेतीपासून दूर जाण्याचा विचारही अनेकजण करु लागले आहेत. कृषी क्षेत्र आधीच कमी होत असल्याने या समस्येवर गांभिर्याने विचार होणे खूपच गरजेचे आहे. अवकाळी पाऊस आला तरी शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या तग धरता आली पाहिजे, या दृष्टीने विशेष नियोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. अवकाळी पावसाला रोखणे मनुष्याच्या हाती नाही, परंतु कशीही परिस्थिती असली तरी शेतकऱ्याला उत्पन्न मिळत राहावे, यासाठी शाश्वत शेतीला सरकारकडून अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचा गेल्या दहा वर्षातील उच्चांक पहावयास मिळाला आहे. थोड्याच परिसरात गारपीट, सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसणाऱ्या या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केल्यास गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागात कुठे ना कुठे तरी जोराचा अवकाळी पाऊस होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या ज्वारी आणि कांदा या महत्त्वाच्या पिकांना यामुळे मोठा फटका बसला आहे. तसेच भाज्यांचेही नुकसान झाले आहे,
यामुळे एकाच आठवड्यात भाज्यांचे दर वाढले आहेत. भाजी दहा रुपयांनी महागली तरी नागरिकांना त्याचा परिणाम जाणवितो, परंतु ज्या शेतकऱ्याची दोन-तीन महिन्याची मेहनत, पिकासाठी केलेला खर्च सर्वच वाया जाते.
याचा मात्र विचार होत नाही. ज्वारीचे नुकसान झाले की त्याचा फटका पुढील वर्षभर पशूपालक शेतकऱ्यांना बसतो. कडबा चांगला मिळाला नाही तर पशूंसाठी दुसऱ्या आहाराची व्यवस्था करावी लागते. पशूखाद्य सध्या खूपच महाग झाले असल्याने शेतकरी मेटाकुटीला येत आहे.
“शेडनेट’चे फायदे
कोणत्याही वातावरणात शेड हाऊस शेती फायदेशीर ठरते. रोग आणि किडींचा प्रमाण लक्षणीय रित्या कमी होते. फुलझाडे, झाडाची पाने, औषधी वनस्पती, भाज्या आणि मसाल्यांच्या लागवडीस मदत करते. याद्वारे उत्पादकता आणि गुणवत्ता वाढीसही मदत मिळते. तसेच रोपांच्या खराब होण्याचे प्रमाणही कमी होते.
लहरी वातावरणामुळे सातत्याने शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील थोड्या तरी भागात शेड नेट कंट्रोल फार्मिंग केलेच पाहिजे. तसेच दुग्ध व्यवसायाकडेही लक्ष दिले पाहिजे. तरच शेतकऱ्यांला रोजचे किमान पाचशे-हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. शेतकरी टिकला तरच शेती टिकेल आणि शेती टिकली तरच सर्वांना अन्न मिळेल.
– ज्ञानेश्वर बोडके, संस्थापक,अभिनव फार्मर्स क्लब
शेड नेट कंट्रोल फार्मिंग
शेडनेट म्हणजे छोट शेड (बांबू किंवा वासे वापरुन) किंवा हाऊस तयार करणे ज्यात ऊन, पाऊस वादळापासून काही प्रमणात पिकांचे संरक्षण केले जाते. यात तापमान, आद्रता, किडरोग यांना नियंत्रित करून उच्च दर्जाची हंगामी तसेच बिगर हंगामी पिकाची लागवड करता येते. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील थोड्या तरी भागात शेड नेट कंट्रोल फार्मिंग करावी, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी सरकार सबसिडीही देते. यात वेगवेगळ्या भाज्या व इतर सहाय्यक पिकांची नियोजनपूर्ण लागवड केल्यास दैनंदिन उत्पन्न मिळू शकते. परंतु अनेक शेतकऱ्यांना याविषयी अधिक माहिती नाही. शेती आणि शेतकरी टिकविण्यासाठी आता सरकारी यंत्रणेने शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.
शाश्वत शेतीची गरज
शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्नाचे चक्र हे शंभर दिवसांचे असते. वातावरणाची कृपा झाली, कोणतीही रोगराई आली नाही तर शंभर दिवसांनी शेतकऱ्याला आपल्या पिकाची विक्री करुन उत्पन्न मिळते. त्यातही जर दर योग्य असेल तर त्याच्या गाठीला काही पैसे उरतात. परंतु ही आदर्श स्थिती नेहमीच निर्माण होत नाही. यामुळे शेतकऱ्याला रोज किमान 500 ते 1000 रुपयांचे उत्पन्न मिळालेच पाहिजे, अशा शाश्वत शेतीची गरज आहे. काही शेतकरी अशा प्रकारे शेती करतही आहेत, परंतु सर्वच शेतकऱ्यांना हे शक्य नाही. यासाठी सरकारने स्वतः पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणे गरजेचे आहे.