मुंबई : मुंबईच्या क्रूझ पार्टीतील ड्रग्स प्रकरणात आर्यन खान याच्या अटकेनंतर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेले केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. वानखेडे यांच्यावर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे.
समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली. वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन हे देखील यावेळी उपस्थित होते.
वानखेडे यांनी काही धक्कादायक दावे केले आहेत. काही लोक माझ्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत, असे वानखेडे यांनी जैन आणि पांडे यांना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दोनजण वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही हाती लागल्याची माहिती देण्यात आली आहे. हे प्रकरण फार गंभीर असल्याचे सांगत वानखेडे यांनी यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान आर्यन खानचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळून देण्यात आला आहे. क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारचे अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले नसताना त्याला कोठडीत ठेवणे उचित नाही. असे करून त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य पणाला लावले जात आहे. त्यामुळे त्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी आर्यनच्या वकिलांनी सोमवारी विशेष सत्र न्यायालयात केली होती.
जामीन अर्जावर तातडीने सुनावणीची आवश्यकता नसल्याचे सांगत अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी आठवडय़ाची वेळ देण्याची मागणी एनसीबीतर्फे करण्यात आली. न्यायालयाने मात्र प्रकरणावरील सुनावणी बुधवारी ठेवत एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
२ ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यन खानसहीत आठ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच या आठही जणांपैकी कोणालाही अद्याप जामीन मंजूर करण्यात आलेला नाही. दुसरीकडे या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी पक्षांपैकी एक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणामध्ये एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.