सांगली – करोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी आज येथे केले आहे. सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडे सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादंगाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, राज्यात वाढत्या करोना संसर्गामुळे 30 एप्रिलपर्यंत विकेंड लाॅकडाऊन, नाईट कर्फ्यू आणि इतर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यातच राज्य सरकार दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा शुक्रवारपासून शहरातील सर्व व्यापारी दुकाने उघडतील अशी आक्रमक भूमिका व्यापारी वर्गाकडून घेण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे नागरिकांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. यामुळे सर्वत्र विरोध होत आहे. दोन दिवसांचे लॅाकडाउन म्हणत सात दिवसांचे लॅाकडाउन लादले. यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. यामुळेच रोष वाढत चालला आहे. ही जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.