मुंबई : रामनवमीच्या दिवशी राज्यात संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी,”गृहमंत्रालय झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत राज्यात होणाऱ्या दंगली हे गृहमंत्रालयाचं मोठं अपयश असल्याचे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात दंगली होणं ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं पाहिजे, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
संजय राऊत यांच्याविषयी बोलताना मी खासदार संजय राऊत यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील बोलणार आहे. सरकारने संजय राऊतांना तातडीने झेड प्लस सुरक्षा दिलीच पाहिजे. संजय राऊत हे खासदार आहेत, तसेच देशातले मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षा प्रदान करायला हवी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
राम नवमीच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी राडे आणि तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दंगल उसळली होती. येथील अनेक भागात वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. मुबईतल्या मालवणी परिसरात राम नवमीच्या शोभायात्रेदरम्यान तीन गटांमध्ये राडा झाला. या सर्व घटनांवरून आता विरोधी पक्ष सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाला धारेवर धरू लागले आहेत.