कराड – यशवंतराव चव्हाण संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श नेते आहेत. त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्राचा सुवर्णकलश आणला. तसेच राज्यात सहकार रुजवला. सामान्य जनतेची नाळ असलेला नेता अशी त्यांची ओळख सर्वार्थाने सार्थ ठरते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
येथील प्रीतिसंगमावर शुक्रवारी कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी अभिवादन केले. त्यांनतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार महेश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान, श्री. शिंदे यांनी प्रीतिसंगमावरील पर्णकुटीत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित संगीत कार्यक्रमास उपस्थिती लावत या कार्यक्रमाचे कौतुक केले.