कराड – महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत कोण काय बोलतय, याच्याशी मला काही देणेघेणे नाही. हे का घडलं, त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. मुळात महाजन कमिटीने केलेल्या या चुका असून त्यांच्यामुळेच महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
येथील प्रीतीसमवर यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या सीमा प्रश्नावरील वक्तव्याबाबत विचारले असता ते बोलत होते. उदयनराजे भोसले म्हणाले, “महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न सुटणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी केंद्र शासनाने दोन्ही राज्यांच्या प्रमुखांना बोलावून समन्वयातून एक मार्ग काढावा. खरं तर त्यावेळी भाषावार विभाजन करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार ती ती गावे त्या राज्यात गेली पाहिजे होती.
मात्र, तसे घडलेले दिसत नाही. या गोष्टीला उशीर झाला असला तरी त्यात सुधारणा करता येईल.” मी दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रीतिसंगमावरील त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी येत असतो. त्यानुसार आज मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी सांगितले.