तळेगाव दाभाडे – साळुंब्रे-गहूंजे पवना नदीवरील पूल खचल्याने ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. त्वरित पूल दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.
पवना नदीवर साळुंब्रे-गहूंजे हद्दीत पूल नसल्याने मोऱ्या टाकून पूल बनविला आहे. या मार्गावरून शेतकरी, दुग्धव्यवसायिक, कामगार, विद्यार्थी व महिलांची ये-जा सुरू असते. या मार्गावरून दारुंब्रे, गोडुंब्रे, साळुंब्रे, गहूंजे व पवन मावळातील नागरिकांची वर्दळ सुरू असते. पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारा जवळचा मार्ग आहे. पावसाळ्यात या मोऱ्याच्या जवळची मुरूम, दगड वाहून जातात. याच धोकादायक मार्गावरुन नागरिक व विद्यार्थी जीव धोक्यात घालून ये-जा करतात.
काही वेळा विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करताना वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पुलावरून दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून ये-जा करतात. या मार्गावरून ये-जा करताना दैनंदिन अपघात होऊन किरकोळ व गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत.
या परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाचा मार्ग असून, साळुंब्रे-गहूंजे पवना नदीवरील पूल बांधण्याची मागणी समीर राक्षे, निलेश राक्षे, राहुल राक्षे, अतुल राक्षे, अविनाश गायकवाड, श्रीनिवास राक्षे, मनोज आगळे, संतोष राक्षे, सुहास विधाटे, विशाल राक्षे व ग्रामस्थांनी केली.