कवडीमोल दराने जनावरांची विक्री
कोपरगाव: यावर्षी उन्हाळ्याची दाहकता मोठ्या प्रमाणावर वाढत असून, तापमानाचा पारा 43 ते 45 अंशांपर्यंत गेला आहे. त्याची झळ पशुधनाला बसली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारच्या बाजारात आणली होती.
दुष्काळामुळे दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध नसल्याने वाळलेला व कोरडा चारा व विविध ठिकाणावरून तोडून आणलेले ऊस वाढे यावरच जनावरांची भूक भागवली जात आहे. याही चाऱ्याचे दर वाढल्याने पशुधनाची मोठी परवड होत आहे. त्यामुळे चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने अनेक विहिरी, बोर कोरडे पडले आहेत. शेत-शिवार ओस पडल्यासारखे झाले असून, अवर्षणग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. शेतकरी दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र जनावरांना चारा मिळत नसल्याने दूध धंदा ही मोडकळीस ठरून पाहत आहे.
एकेकाळी कोपरगावची ओळख कॅलिफोर्निया म्हणून होती. आता ती पुसत चालली आहे. फळबागांना पाणी न मिळाल्याने त्या करपून जाऊन तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुष्काळाची तीव्रता वाढवत असल्याने तसेच जनावरांसाठी हिरवा चारा लागवड न झाल्याने दुभत्या पशुधनाची भूक ज्वारी, मका, कांदा पात, उसावर भागवली जात आहे. कमी उपलब्धतेमुळे तेही महाग झाल्याने शेतकऱ्यांना न परवडणारे झाले आहे. पशुधनासाठी टॅंकरद्वारे विकत पाणी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कधी नव्हती दुष्काळाची दाहकता यावर्षी भासत आहे.
आज सोमवार आठवडे बाजार असल्याने येथील कोपरगाव बाजार समिती आवारातील जनावरांच्या खरेदी-विक्री बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांची खरेदी-विक्री झाली. त्यामुळे तालुक्यातील परिस्थिती किती भयावह आहे, हे यावरून दिसून येत आहे. कृषिप्रधान देश म्हणवल्या जाणाऱ्या या देशात दुष्काळामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पशुखाद्य व विविध पशुआहार यामध्ये भाववाढ झाल्याने तेही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने दावणीला बांधलेली जनावरे नाईलाजाने विक्रीला आणावी लागत आहे. आजच्या बाजारात अनेक शेतकऱ्यांनी चारा व पाण्याची टंचाई असल्याने जनावरे विक्रीसाठी आणले होते. कमडीमोल दराने अनेकांना आपली जनावरे विकण्याची वेळ आली.