बावडा – येथील जीवनावश्यक वस्तूची चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार व व्यापारी संघटनेला करण्यात आली आहे.
शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी दिली आहे. वास्तविक शासनाने पूर्वीच्याच दरात विक्री करण्याचे आवाहन करूनही दुकानदार मात्र मनमानी पद्धतीने मालाची विक्री करताना सर्रास दिसून येत आहेत. सामान्य व गोरगरीब जनतेचे अतोनात हाल होत असताना जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे.
त्यामुळे अशा दोषी असणाऱ्या व्यापारी व दुकानदारांवर कारवाई करावी, अन्यथा करोनाग्रस्त परिस्थितीत जनआंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते निशिकांत तोरणे, बळीराम सूर्यवंशी, शुभकांत तोरणे, बाबा सावंत, कृष्णा काळे, स्वप्नील नाईकनवरे, उदयकांत तोरणे, अनिल जाधव, निहाल राज गायकवाड, शिवकांत तोरणे आदींच्या सह्या आहेत.