कडूस, (वार्ताहर)- खेड तालुक्यातील पश्चिमेकडील दुर्गम भागातील कडूस येथील श्री पांडुरंग मंदिरात उत्सवानिमित्त, आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसर्या दिवशी, मराठी भाषाप्रभू डॉ. पंकज गावडे महाराज यांच्या किर्तनाला भाविक श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
श्री पांडुरंग उत्सवाचे यंदाचे 378वे वर्ष आहे. गावडे महाराजांनी जगद् गुरू या उपाधीबद्दल साध्या सोप्या भाषेत निरूपण केले. इंद्रायणी नदी काठावरचे ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांचे जीवन, पापमुक्तीसाठी इंद्रदेवाचे इंद्रायणीत स्नान, राष्ट्रमाता जिजाऊचे अनुष्ठान, सिद्धबेट यांसारख्या उदाहरणांनी इंद्रायणीचे महत्त्व विशद केले.
संत तुकारामांचे प्रिय भक्त, संत गंगाजीबुवा मवाळ यांच्यासाठी कडूस मुक्कामी येणं याबाबत प्रासंगिक अभंगाद्वारे सांगून श्री क्षेत्र कडूसचे महत्त्व अन्य क्षेत्रापेक्षा वेगळे असल्याचे सांगितले. माघ शुद्ध दशमीला संत तुकाराम महाराजांना स्वप्नात चैतन्य महाराजांकडून अनुग्रह प्राप्त झाला. म्हणून अजून 22 वर्षांनी होणारा 400वा अनुग्रह सोहळा कडूस गावात, माघ शुद्ध दशमीला ’न भूतो न भविष्यती ’असा दिमाखदार व्हावा, असे आवाहन कडूस येथील अध्यक्ष बाळासाहेब भा. ढमाले, जीर्णोद्धार समिती अध्यक्ष संतोष तात्या ढमाले, सचिव चांगदेव ढमाले, दामोदर बंदावणे, पंडित नेहेरे, आप्पासाहेब धायबर, किसनराव नेहेरे, शंकर कावडे या उपस्थित ज्येष्ठ भाविकांना केले.