मुंबई, दि. 11- अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण कुठे कमी पडतोय याचे आत्मचिंतन करुन रस्ते सुरक्षा ही लोकांची सुरक्षा आहे, त्यांच्या जिवाची सुरक्षा आहे असे समजून घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची 11वी बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
अपघातामुळे निष्पाप लोकांचा जीव जातो आणि त्यांचे कुटुंब संकटात सापडते. घरातला एखादा कर्ता व्यक्ती मृत्यु पावल्यास त्या कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक अवस्था काय होते ही आपल्याला कल्पना आहे. यासाठी स्थानिक समित्यांनी वारंवार आढावा घ्यावा. यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
रस्ते सुरक्षेसाठी कायद्याच्या धाकाबरोबरच प्रबोधनाची सुद्धा गरज आहे. यासाठी प्रमुख महामार्गावर वेगाची मर्यादा दर्शविणारे फलक, गतिरोधक, अपघात ठिकाणाची माहिती, वळण असलेल्या रस्त्याची माहिती असे माहिती फलक असले पाहिजे. अपघातामध्ये होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे.
अपघात झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार मिळणे आवश्यक असते. ग्रामीण भागामध्ये ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागे रेडियमच्या पट्ट्या दर्शनी भागावर असाव्यात, अशा सूचनाही परब यांनी केल्या.