परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
लंडन – पाकिस्तानकडून दहशतवादाला उघडपणे प्रोत्साहन दिले जात आहे. जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादाला अर्थसहाय्य आणि दहशतवादी गटांमधील भरतीला प्रोत्साहन बंद केले जात नाही, तोपर्यंत पाकिस्तानबरोबरच्या चर्चेमध्ये काहीही वाव नाही, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या मुद्दयावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहीलेल्या लेखावर प्रतिक्रिया देताना जयशंकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. दक्षिण आशियवर आण्विक युद्धाचे सावट असल्यामुळे भारत-पाकिस्तानदरम्यानची चर्चा त्वरित सुरू होणे आवश्यक आहे, असे इम्रान खान यांनी या लेखामध्ये म्हटले आहे.
ब्रुसेल्समधील एका मुलाखतीदरम्यान जयशंकर यांनी पाकिस्तानबरोबर चर्चेची कल्पनाही निरर्थक असल्याचे म्हटले आहे.
इम्रान खान यांचा लेख वाचण्यासही आपल्याजवळ वेळ नव्हता.
मात्र जोपर्यंत दहशतवादाला उघड पाठिंबा देणे पाकिस्तानकडून थांबवले जात नाही, तोपर्यंत चर्चा अशक्य आहे. दहशतवाद दिवसाढवळ्या केला गेला आहे, असेही जयशंकर म्हणाले. जानेवारी 2016 मध्ये पठाणकोटमधील हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानबरोबरची चर्चा भारताने थांबवली आहे.
जम्मू काश्मीरमधील निर्बंध आगामी काळात हळूहळू शिथील केले जातील, असेही त्यांनी सांगितले. काश्मीरचा विशेष दर्जा हटवून बिगर मुस्लिमांना काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदीचे अधिकार देण्यामागे हिंदू अजेंडा असल्याचा आरोपही जयशंकर यांनी फेटाळला.