पुणे – ढोल-ताशांचा गजर…गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष…रांगोळ्यांच्या पायघड्या…फुलांची उधळण…भक्तांची पारंपारिक वेशभूषा अशा उत्साही वातावरणात पुण्यातील मानाचे पाचही गणपती सोमवारी थाटात विराजमान झाले. यंदाही मानाच्या गणपतींची अतिशय शिस्तबद्ध व दिमाखदार पद्धतीने मिरवणूक निघाली. दुपारी 1 वाजेपर्यंत शहरातील मानाच्या पाचही गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आता पुढचे दहा दिवस शहरात भक्तीमय व उत्साही वातावरण असणार आहे.
अर्थवशीर्ष पठण आज
आज (मंगळवार) रोजी सकाळी 6 वाजता ऋषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे महिलांचे सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण होणार आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता गणेशयागाचा शुभारंभ योगिराज भाऊमहाराज परांडे यांच्या हस्ते होणार आहे. याचे पौरोहित्य मिलींद राहुरकर आणि नटराज शास्त्री करणार आहेत. तर रात्री 10 वाजता वारकरी बंधू हरी जागर करणार आहेत. दि. 3 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान दररोज पहाटे 5 ते 6 यावेळात विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, परिमंडळ-1 च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे आदी उपस्थित राहणार आहेत.