धुळे – धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ मंगळवारी भीषण अपघात झाला. ब्रेक फेल होऊन कंटेनर रस्त्यावरील प्रवाशांना चिरडत एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात 20 जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. काही जण अद्यापही अत्यावस्त असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
अधिक माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येते. याच गावाजवळ साधारणतः सकाळी 11 वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली. एक 14 चाकी कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो वळणावरील लोकांना चिरडत थेट हॉटेलमध्ये शिरला.
त्यात आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहाने उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. या अपघाताची दृश्ये एका सीसीटीव्हीत कैद झाली, त्यावरून या अपघाताचे गांभीर्य लक्षात येत आहे.
उतारावर ब्रेक फेल झाले?
महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या जवळ असलेल्या भागात मोठा उतार आहे. या उतारावर मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या या कंटेनरचे ब्रेक फेल झाले होते. त्यानंतर हा कंटेनर थेट पळासनेर गावाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. या कंटेनरने अन्य काही वाहनांनाही धडक दिली. त्यामुळे गाडीतील काही जणांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.