काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका ग्रुपमध्ये एक पोस्ट वाचली. ज्यामध्ये त्या व्यक्तीने “गायीचे दूध कसे चांगले आणि म्हशीचे कसे आरोग्यास वाईट असते’ यावर एक प्रदीर्घ लेख वैज्ञानिक संदर्भासहित स्पष्ट करून लिहिला होता. बरेच मुद्दे त्यांनी यानिमित्ताने प्रकाशित केले होते. काहींशी मी सहमत होते तर काही मुद्दे हे न पटणारे वाटत होते. बऱ्याच अंशी इतरही लोक याच विचारांचे असावेत. खरंतर आपल्या आयुर्वेदानुसार गाईचे दूध आरोग्यास लाभदायक असते हे मान्य. पण त्याचाच अर्थ म्हशीचे दूध वाईट असते आणि ते वापरूच नये हेही म्हणणे चुकीचे वाटते. कारण बरीचशी लोकं आजही म्हशीच्या दुधाचाच वापर करतात. बऱ्याच जणांनी त्यांना हे सर्व मुद्दे पटत नसल्याचे कमेंट्सद्वारे व्यक्त केले. परंतु काही जणांनी मात्र त्या व्यक्तीला अगदी आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले.
इतक्या अर्वाच्च भाषेत कमेंट आणि शिवीगाळ होत्या की “जे वाटले ते सांगणेही गुन्हा होईल’ असे कमेंट्स मधून जाणवत होते. काही जणांच्या कमेंट्स या त्या व्यक्तीला चुकीचे ठरवून मोकळ्या झाल्या. काहींनी प्रामाणिकपणे काय बरोबर वाटले आणि काय खटकले हे विस्तारून सांगितले. परंतु या अशा अश्लाघ्य आणि अश्लील भाषेतील कमेंट करतात त्यांना दुसऱ्यांच्या मतांवर तुटून पडण्याचा काहीच अधिकार नाही.
सोशल मीडिया हे समाजाचे असे आभासी माध्यम आहे ज्यातून आपल्याला परस्परांच्या संपर्कात राहता येते. शिवाय सर्व विषयांवरील सर्व माहिती मिळते आणि त्यावर आपली मते ही व्यक्त करता येतात. पण हा हक्क प्रत्येकालाच मिळतो. मग ट्रोल होणाऱ्या व्यक्तीने त्याचे मत मांडले तर चुकीचे काय? फक्त मत मांडले म्हणजे समाजावर तसे वागण्याची जबरदस्ती नक्कीच केली नाही. मान्य आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काहीही पोस्ट करताना त्याच्या सत्यतेची पडताळणी करणे आवश्यक आहे. मोठ्या जबाबदारीने ते करायला हवे. पण म्हणून त्यांचे विचार पटले नाहीत म्हणून त्यांच्यावर वाटेल तसे शिंतोडे उडवून त्यांचे ते विचार बेदखल करण्याचा निर्णय या ट्रोल करणाऱ्यांनी स्वतःच घेऊन टाकला आहे.
मग अशा ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या गोष्टी घाणेरड्या भाषेत बरळण्यासाठी जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळते ना तेच स्वातंत्र्य लेख पोस्ट करणाऱ्या व्यक्तींना चांगल्या, सभ्य आणि शांत भाषेत व्यक्त होण्यासाठी का मिळू नये?
खरंतर, आपण जे काही ऐकतो किंवा वाचतो ते त्या सांगणाऱ्याचे किंवा लिहिणाऱ्याचे स्वतःचे मत असते. म्हणजे ती वस्तुस्थिती असेलच असे काही नाही. अगदी तसेच वाचणाऱ्याचे जे मनात असते, त्यांचे जे मत असते तो त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन असतो. तेव्हा तुमच्या मनात जे मत असते तेही खरे असेलच आणि तेच सर्वार्थाने बरोबर असेलच असेसुद्धा नाही ना! फक्त एखाद्याचे विचार पटत नाहीत म्हणून तो कसा बुरसटलेल्या विचारांचा, चुकीचा आणि बुद्धीहीन, काहीही माहिती नसलेला आहे हे वाईट शब्दात असे ट्रोलर्स सांगू लागतात.
भारतासारख्या लोकशाही देशात प्रत्येकाला बोलण्याचा, आपले मत व्यक्त करण्याचा आणि एखादी गोष्ट जर नाही पटली तर विरोध करण्याचाही अधिकार आहे. पण विरोध करण्याची ही एक पद्धत असते. एखाद्याचे विचार व लेख पटला नाही म्हणून त्या व्यक्तीवर नको ती आणि नको तेवढी चिखलफेक करणे ही ती पद्धत नक्कीच नव्हे. एवढेच नाही तर एखाद्याने शिव्या द्यायला व कठोर टीका करायला सुरुवात केली की अनेकांच्या द्वेषाचा जणू पूरच लोटतो. चुकत असेल तर खुशाल टीका करावी पण तीही भाषेचे आणि शब्दांचे तारतम्य बाळगून.
अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्यावर ट्रोलिंग केले जाते त्यांच्यासाठी सांगावीशी वाटते ती म्हणजे आपला मुद्दा जर समाजासाठी घातक नसेल तर या अशा ट्रोलर्सकडे जास्त लक्ष देऊ नये. खरे तर आपण अशा व्यक्तींना ओळखतही नसतो. मग चेहरा नसलेल्या या अशा व्यक्तींना किती महत्त्व द्यायचं हे तुमचं तुम्हालाच कळायला हवं. इतकेच काय, काही लोक अगदी काहीही संबंध नाही, कधीही पाहिलेही नाही अशा अनोळखी लोकांशी वादविवाद करत बसतात आणि स्वतः मात्र त्यांचं म्हणणं अमान्य करून, त्यांचा मुद्दा खोडून काढून, आपलंच म्हणणं कसं बरोबर हे पटवून द्यायचा ही प्रयत्न करतात. सोशल मीडियावर काही पोस्ट करताना किंवा कॉपी-पेस्ट करतानासुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि तुमच्या मनाला त्या गोष्टी पटायला, दिसायला हव्यात या अशा गोष्टी महत्त्वाच्या वाटतात.
सोशल मीडियावरील अशा ट्रोलर्समुळे बऱ्याचदा पुढे काहीही पोस्ट करायला बरेचसे जण घाबरतात. खरंतर या ट्रोलिंगपासून अगदी सामान्य नागरिक असो किंवा कोणी मोठी सेलिब्रिटी, पुरुष असो वा महिला कोणीही वाचू शकलेले नाही. त्यामुळे मला वाटते सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम असून अनेक प्रतिभावान लोकांना ते आपल्या व्यवसाय वृद्धीसाठीही वापरता येऊ शकेल. अशा लोकांनी या नव्या माध्यमाचा पुरेपूर वापर करावा. पण सामाजिक भान आणि मतांचा विचार करून.
शेवटी काय! तर मतमतांतरे असावीत, चर्चा व्हाव्यात. मात्र त्यात कोणतीही पातळी सोडली जाऊ नये. कारण ही एक प्रकारची मानसिक हिंसा आहे. त्यामुळे वाईट पद्धतीने ट्रोल केल्याने संबंधित व्यक्तीला मानसिक त्रास सहन करावा लागतो. कधी कधी या ट्रोलिंग पाई पक्के मित्र आणि सख्खे शेजारी, जीवाभावाचे नातेवाईकही एकमेकांचे शत्रू होऊन जातात. त्यामुळे प्रत्येकाने आपली मते व्यक्त करा; पण शब्दांचे तारतम्य बाळगून. कारण एखाद्याची प्रतिमा अशा पद्धतीने डागाळण्याचा हक्क कोणालाही नाही.
– तेजस्वी दळवी