कॉंग्रेसच्या “भारत जोडो’ यात्रेला सुरुवात झाली आहे. कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी ही यात्रा बारा राज्यांतून जाईल, सुमारे साडेतीन हजार किलोमीटरचे अंतर पार करेल आणि दीडशे दिवस चालेल. गेल्या काही वर्षांत निवडणुकांतील सुमार कामगिरी, नेतृत्वाचे संकट आणि पक्षाला लागलेली गळती यांमुळे कॉंग्रेसला भवितव्य काय, असे प्रश्न विचारले जाऊ लागले होते. त्यामुळे या यात्रेला एक वलय निर्माण झाले आहे. एका अर्थाने पक्षसंघटनेने “दृढ’ चालावे म्हणून ही पदयात्रा आहे असेच म्हटले पाहिजे.
विरोधकांनी केवळ संसदेत किंवा माध्यमांमध्ये सरकारवर शरसंधान करून भागत नसते. लोकांमध्ये जाऊनच लोकांच्या समस्यांसाठी लढावे लागते तरच मतदारांमध्ये त्या राजकीय पक्षाविषयी आस्था निर्माण होऊ शकते. कॉंग्रेसने सुरू केलेल्या “भारत जोडो’ यात्रेकडे त्या दृष्टीने पाहिले पाहिजे.
आपली निष्क्रियता दूर सारून पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयोग आहे, असे म्हटले जात आहे. विशेषतः 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर द्यायची तर विरोधकांनी अधिक आक्रमक आणि सक्रिय असणे गरजेचे. कॉंग्रेसने सक्रियतेच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे याचे “भारत जोडो’ यात्रा हे द्योतक आहे, असे म्हटले पाहिजे.
अशा यात्रांचा उद्देश अखेरीस सत्ताप्राप्ती हाच असतो. यात्रेच्या निमित्ताने संघटनेत चैतन्य यावे, वातावरणनिर्मिती व्हावी, शक्तिप्रदर्शन व्हावे आणि सरकारला या सगळ्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरावे असेच सामान्यतः या यात्रांचे प्रयोजन असते. त्यामुळे विरोधकांनीच अशा यात्रा काढल्याची उदाहरणे अधिक सापडतील. पदयात्रेला पर्याय म्हणून भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनी 1990 च्या दशकात रथयात्रा काढली होती आणि त्याचा परिणाम तत्पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागलेल्या भाजपचा आलेख लक्षणीय प्रमाणात उंचावण्यात झाला होता.
तेलगू देसम पक्षाची स्थापना केल्यांनतर 1982 साली एन. टी. रामाराव यांनी काढलेल्या यात्रेने रामाराव यांचे राजकीय भवितव्य पालटून टाकले आणि ते मुख्यमंत्री झाले. चाळीस हजार किलोमीटर नऊ महिन्यांत पार करताना रामाराव यांनी आंध्र प्रदेशचा राज्यव्यापी दौरा तब्बल चार वेळा केला होता. मुरली मनोहर जोशी यांनी राष्ट्रीय एकता यात्रा काढली होती आणि तीही चौदा राज्यांतून गेली होती. 2011 साली ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये अशीच यात्रा काढली होती आणि डाव्यांची सत्ता संपुष्टात आणण्यात ममता यांना यश आले एवढेच नव्हे तर तेव्हापासून त्याच त्या राज्याचा मुख्यमंत्री आहेत. 1983 साली चंद्रशेखर यांनीही देशव्यापी पदयात्रा केली होती. अर्थात, त्याचा राजकीय लाभ चंद्रशेखर यांना लगेचच मिळाला नाही; तथापि बहुतांशी यात्रांनी त्या आयोजित करणाऱ्या पक्षांना वा नेत्यांना हात दिला आहे, हेही नाकारता येत नाही.
तेव्हा कदाचित तोच इतिहास लक्षात घेऊन कॉंग्रेसने हेच शस्त्र वापरण्याचे निश्चित केले असावे. अर्थात, अशा यात्रांचा राजकीय लाभ उठवायचा तर त्या यात्रेचे प्रयोजन स्पष्ट असायला हवे; यात्रेतून निर्माण होणारे वातावरण कायम राहील याचा कटाक्ष बाळगायला हवा आणि मुख्य म्हणजे यात्रेचे आयोजन करणाऱ्या नेत्यांचा त्यातील सहभाग सातत्याचा हवा. आरंभशूरता ही काही काळ प्रसिद्धी मिळवून देऊ शकते; मात्र, यात्रेचा आश्वासक परिणाम साधायचा असला तर त्यात सातत्य आणि गांभीर्य हवे. कॉंग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपविरोधी वातावरण तयार करण्यासाठी पदयात्रेचे शस्त्र परजले आहे हे खरे; पण त्या यात्रेचा दीर्घकालीन परिणाम साधायचा तर केवळ भाजप अथवा मोदी विरोधी भाषणे देऊन भागणार नाही. कॉंग्रेसला त्या पलीकडे जाऊन या यात्रेला विरोधकांचा आणि त्यापलीकडे जाऊन जनतेचा हुंकार असे स्वरूप द्यावे लागले. कॉंग्रेस आणि राहुल गांधी त्यात यशस्वी होतात का, यावर या यात्रेचे यश अवलंबून राहील.
वास्तविक देशासमोर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा अनेक समस्या आहेत. मात्र केंद्रातील भाजप सरकारला तगडे आव्हान देऊ शकतील आणि या समस्या ऐरणीवर आणून भाजप सरकारला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडतील असे सशक्त विरोधी पक्ष नाहीत हे खरे दुखणे आहे. भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांचा देशव्यापी पगडा नाही आणि ज्या कॉंग्रेसचा देशव्यापी विस्तार आहे त्या पक्षात मरगळ आली आहे. खरे म्हणजे प्रबळ विरोधी पक्ष असणे हे लोकशाहीच्या जिवंतपणाचे लक्षण. मात्र, त्यांच्याच अनुपस्थितीमुळे भाजपसमोर आव्हान उभे राहिलेले दिसत नाही आणि यापुढे भाजप वगळता अन्य पक्षांना भवितव्य नाही अशी दर्पोक्ती भाजप नेते करताना दिसतात. भाजपला टक्कर द्यायची तर विरोधकांना मरगळ दूर सारून सक्रिय होण्याची आणि निर्धाराने उभे राहण्याची आवश्यकता आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेने किमान कॉंग्रेस लढण्यास उत्सुक आहे एवढे जरी चित्र निर्माण केले तरी या पदयात्रेतून काही निष्पन्न झाल्याचे म्हणता येईल. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने कॉंग्रेस नेत्यांनी भाषणे देण्याप्रमाणेच सामान्यांच्या कैफियती ऐकल्या आणि त्या ठसठशीतपणे मांडल्या तर जनतेला काही आश्वासकता या पदयात्रेत दिसेल. महागाई, बेरोजगारी, सामाजिक अस्वस्थता, व्यापाऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांच्या अनंत समस्या आहेत हे नाकारता येणार नाही. सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न हा नेहमीच अशा समस्यांवरून असंतोष निर्माण होण्यापूर्वीच जनतेचे लक्ष विचलित होईल, अशा विषयांना हवा देण्याचा असतो. मात्र, कॉंग्रेसच्या या पदयात्रेने जनतेशी निगडित मूलभूत मुद्द्यांकडे लक्ष वेधून सरकारला उत्तर देण्यास भाग पडायला हवे.
ही पदयात्रा कॉंग्रेसने सुरू केली असली तरी ती पक्षनिरपेक्ष आहे असे विधान कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी एका मुलाखतीत केले आहे. याचाच अर्थ भारत जोडताना विरोधकांना देखील जोडण्याचे काम कॉंग्रेसने करायला हवे. कन्याकुमारीतून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली तेव्हा द्रमुक नेते आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांना खादीपासून बनविलेला राष्ट्रध्वज सोपविला. द्रमुकला कॉंग्रेसच्या या पदयात्रेविषयी सहानुभूती आहे हेच यातून प्रतीत झाले. मात्र, द्रमुक हा कॉंग्रेसचा मित्रपक्षच असल्याने त्यात आश्चर्य नाही. मात्र, कॉंग्रेसशी ज्या प्रादेशिक पक्षांची लढत आहे अशांना देखील भाजपच्या विरोधात एकजूट करण्याची भूमिका कॉंग्रेसने बजावली तर या पदयात्रेतून काही हाती लागेल.
अर्थात, त्यासाठी या पदयात्रेला सतत पाच महिने तेच चैतन्य लाभेल हे पाहणे पक्षनेतृत्वाची जबाबदारी आणि कर्तव्यही. कॉंग्रेसचा तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क तुटलेला आहे आणि संघटन विसविशीत झाले आहे. याचे एक कारण म्हणजे पक्षाने सत्ता मिळविण्याची गमावलेली ऊर्मी. मात्र, दुसरे तितकेच प्रमुख कारण म्हणजे पक्षाची गलितगात्र झालेली संघटना. या पदयात्रेने केवळ भाजपविरोधी भूमिका एवढीच आपली विषयसूची ठेवली तर भाजपकडून चहूबाजूंनी कॉंग्रेसवर शाब्दिक हल्ले होतील; पण कॉंग्रेसने आपल्या संघटनेत प्राण ओतण्यासाठी या यात्रेचा उपयोग करून घेतला; नवोदित पण उत्साही स्थानिक-प्रादेशिक नेत्यांचा शोध घेतला, त्यांना संधी दिली तर कॉंग्रेसला संघटनात्मक संजीवनी मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल.
भारत जोडो यात्रा म्हणजे जादूची कांडी नव्हे. दीडशे दिवसांनी कॉंग्रेस अचानक (पान 1 वरून) नवसंजीवनी मिळालेला पक्ष होईल असे मानणे दिवास्वप्न ठरण्याची शक्यता अधिक. पक्ष निष्क्रियावस्थेत असताना त्यात लढण्याची चेतना जागृत करायची तर ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. भारत जोडो यात्रेचा चोख उपयोग कॉंग्रेसने करून घेतला तर 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी पाया तरी तयार होऊ शकेल. अर्थात, या सगळ्या स्वप्नरंजनाचे घोडे पुन्हा येऊन अडते ते नेतृत्वाच्या मुद्द्याशी.
कॉंग्रेसची सूत्रे गांधी कुटुंबाकडे असली तरी गेल्या काही काळात कॉंग्रेसमधून देखील यास आव्हान मिळू लागले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राहुल गांधी यांनी सोडलेले अध्यक्षपद मात्र निर्णय घेण्याची हातातच ठेवलेली सूत्रे. आताही भारत जोडो यात्रा ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. येत्या 19 ऑक्टोबर रोजी कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आहे. तोवर भारत जोडो यात्रेचा दीड महिना पूर्ण झाला असेल. या निवडणुकीत राहुल गांधी हे उमेदवार असतात का हे येत्या महिनाअखेरपर्यंत समजेलच; मात्र भारत जोडो यात्रा म्हणजे राहुल यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्याची पूर्वतयारी आहे, असाही आक्षेप घेतला जात आहे.
राहुल यांनी अध्यक्षपद स्वीकारले तर भारत जोडो यात्रा राहुल यांच्या नेतृत्वाखाली होण्यास काही अर्थ राहील. अन्यथा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत नेमकी भूमिका काय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईलच; पण अन्य कोणाला अध्यक्ष करण्यात आले तर या भारत जोडो यात्रेला तेच गांभीर्य राहील का, हाही उपप्रश्न त्यातून निर्माण होईल. भारत जोडो यात्रा आयोजित करून कॉंग्रेसने किमान भाजपला लढत देण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे, असे म्हणता येईल. मात्र कॉंग्रेसला अद्यापि मोठी मजल मारायची आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे.
यापूर्वीच्या ज्या यात्रा सफल झाल्या त्यात समान काही असेल तर त्या यात्रांचे नेतृत्व करणाऱ्यांपाशी असणारे वलय, त्यांच्यापाशी असणारी विश्वासार्हता, सामान्यांना जिव्हाळ्याचे वाटतील असे मुद्दे आणि मुख्य म्हणजे त्या यात्रांना प्रतिसाद द्यावा असे सामान्य जनतेला वाटावे असे “अपील’. सामान्यांना यात्रा आपल्या वाटल्या तरच त्या यात्रांना प्रतिसाद मिळतो आणि त्या सफल होतात आणि अपेक्षित परिणाम साधतात. तेव्हा भाजपवर टीका करतानाच भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसला असे मुद्दे तपासावे लागतील ज्यांच्याशी सामान्य नागरिक सहज जोडले जातील.
मोदी आणि भाजपचे नेते आपल्या भाषणांतून सरकारी योजनांच्या लाभार्थींची संख्या सांगत असतात. त्या आकडेवारीमुळे भाजपच्या दाव्यांना वजन येते. भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसला भाजपच्या दाव्यांमधील फोलपणा तळागाळातील परिस्थितीवरून पुराव्यानिशी दाखवून देता आला, तर या भारत जोडो यात्रेला निराळेच परिमाण प्राप्त होईल. मात्र त्यासाठी मेहनत हवी आणि चिकाटीदेखील हवी. कॉंग्रेसने हे केले तर अन्य विरोधी पक्षांना देखील कॉंग्रेसविषयी जवळीक करताना संकोच वाटणार नाही ना महत्त्वाकांक्षा आड येतील. कारण देशव्यापी अस्तित्व केवळ कॉंग्रेसचेच आहे, हे कॉंग्रेस ठसवू शकेल.
म्हणूनच भारत जोडो यात्रा ही कॉंग्रेसची 2024 साठीची पूर्वतयारी आहे; की राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदासाठीची वातावरण निर्मिती आहे की पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या प्रक्रियेची नवीन सुरुवात आहे, असे अनेक तर्क लढविले गेले; तरी वस्तुस्थिती ही आहे की भारत जोडो यात्रा म्हणजे कॉंग्रेससाठी आत्मशोधाची, आपल्या क्षमता तपासण्याची, आपल्या संघटेनच्या उणिवा तपासण्याची आणि त्या दूर करण्याची, पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उभारी देण्याची, कॉंग्रेसानुकूल सामाजिक संघटनांना आपल्याशी जोडून घेण्याची, अन्य भाजपविरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्याची आणि मुख्य म्हणजे सामान्यांमध्ये कॉंग्रेसबद्दल आश्वासकता निर्माण करण्याची संधी आहे. या यात्रेची फलनिष्पत्ती आणि परिणाम काय हे सहा महिन्यांत समजेलच.
राहुल गोखले