खुपच अस्वस्थ, अनावर झाले की मन गोष्टी गुंफायला लागतं. बऱ्याचदा ही गुंफण त्याच्या-माझ्या भोवतीच असते. न सांगता येणारी डोहातली वेदना असो की आकाशाच्या पार असणारे कोणी अस्तित्व… सगळे या गुंफणीतले धागे असतात. जे अनुभवता आले नाहीत कधीच असे क्षणदेखील असतात आणि डावलले गेल्याची किनारही असते.
माणसे भरल्यापोटी भावना व्यक्त करतात तेव्हा आश्चर्य वाटते मला. पोट भरलेलं असते तेव्हा वेदना बोथट होत जातात. खरी वेदना हृदयातून उमलते. आपण परिट घडीच्या चेहऱ्याने लपवू पाहतो ती वेदना! पण ते आतलं विस्कटलेपण? त्याचे काय करायचे? माणसे अशावेळी व्यक्त होण्यासाठी जागा शोधू लागतात. झाडे-माडे, फुले-वेली, चित्रे, आरसे, बागेतली बाकडी… काहीही चालते त्यांना बोलण्यासाठी. ती बोलत सुटतात. वाहत्या झऱ्यासारखे वाटतात मला असे लोक.
जगताना काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे हे कधीच जाणून घेत नाही आपण. ते जाणून घेण्याचेही एक शास्त्र असते खरेतर. “आउट ऑफ द बॉक्स’ जाऊन आपल्याला विचार तर करायचाच नसतो, कृती तर त्याहून करायची नसते. आपण आपल्याला समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतोच बहुदा. आपण आपल्यातल्या नग्नतेला सामोरे जायला कचरतो. राजेश गुरव यांचा एक शेर आहे,
चिलमन के पीछे मेरे
सूरज उगा करता था रोज
आंधी ऐसे आयी की जिसने
बेपर्दा की शख्सियत मेरी
काय हवंय आपल्याला हे एकदा स्वत:शी मान्य करायला काय हरकत आहे? आपण आपल्या भूतकाळातच इतके रमतो की आपल्याला काय हवे काय नको हे ठरवायला सुद्धा आपण आपल्या भूतकाळाचाच सहारा घेतो. आयुष्य म्हणा अथवा डेस्टीनी, आपल्याला यासाठी संधी देत असते. अंतानंतर पुन्हा नव्याने जन्मण्याची संधी! निसर्गातला प्रत्येक घटक मरतो आणि पुन्हा रुजतो. रुजतो यासाठी म्हणतेय की नवा जन्मही रुजवतच असते प्रत्येक जीवाची. आपल्याला झाडे हेच तर शिकवतात. नवी पालवी फुटणे हे सृजन आणि पानगळ हा अंतीमोत्सव. झाडांचीही माणसांसारखीच सायकोलॉजी असते. त्यांना स्पर्श, राग, लोभ, प्रेम या भावना कळतात आणि व्यक्तही करता येतात. तीही रूसतात, रडतात, आनंदाने डोलतात, कोमेजतात. झाडे आपल्यासारखा प्रवास करत नाहीत पण आपल्यासाठी ओलावा मात्र शोधून ठेवतात. आपल्यासारख्या तहानलेल्या मनांचा शोधही ती घेत राहतात.
आपल्या प्रत्येक सादाला प्रतिसाद देण्याची कुवत निसर्गाकडे आहेच. आपल्या लहानातल्या लहान कृतीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या हेलकाव्या पर्यंतची प्रत्येक भावना निसर्गापर्यंत पोचते. माणूस जितका आदिम होईल, जितका निसर्गाच्या जवळ जाईल तितका तो आंतरिक सुखाच्या जवळ जात असावा. हे अरण्यसूक्त जे समजून घेतात ते लोक आपल्यात लपलेली निरागसता जपू शकतात. ऋतूंमध्ये होणारे बदल असोत नाहीतर त्याच्या प्रतीकांमधील, प्रत्येक घटना एक कहाणी सांगत असते. एक अशी कहाणी जी चिरकाल अनुभवास यावी. शिशिरातली पानगळ असो की पावसाची संततधार, मला वाटते ही प्रत्येक गोष्ट आपल्याला काही सांगू पाहते. या सगळ्यांना मूळापासून वाचवावे, कारण आपले आयुष्य प्रभावित करणाऱ्या या गोष्टी आहेत.
कधीतरी मी वाचले होते की, जंगलातली झाडे त्यांच्या मुळांच्या माध्यमातून एकमेकांशी बोलतात. त्यांचीही एक भाषा असते. आपले जीवनरस ते मुळांच्या वाटे एकमेकांना पुरवतात. जंगल वाचता यावे असे वाटत असेल तर आधी ही झाडांची भाषा शिकायला हवी तेव्हाच त्यांचे बहर, पानगळ, फांद्यांचे वठणे, पुन्हा पालवी फुटणे, कळीचे उमलणे आणि फलधारणा होणे हे सारे काही समजेल. खरे तर मानवी आयुष्य याहून वेगळे कुठे असते. आपणही कोणत्यातरी अदृश्य धाग्याने जोडलेलोच असतो की! आपणही कधीकधी आपल्या जीवलगांशी नि:शब्द बोलतोच की! तोही संवादच असतो. जिथे शब्द, भाषा अशा कशाचीही गरज भासत नाही. मुळे एकमेकात गुंतलेली झाडे होतो आपण…
– मानसी चिटणीस