एक असतं माकड. भारी उपद्व्यापी. सगळ्या गोष्टींबद्दल त्याला फार उत्सुकता. काहीही नवीन पाहिलं की, हात लावून पाहिल्याशिवाय त्याचं समाधान होत नसे. पण त्याला हात लावताना ते आपलं आहे का, हे करताना दुसऱ्याला काही त्रास होईल का? असले काही विचार त्याच्या डोक्यात येत नसत.
एकदा असंच ते माकड झाडावर बसलं होतं. समोर काही घरं होती. एका घरासमोर एक आज्जीबाई लहान नातवाला मांडीवर घेऊन अंगणात बसली होती. एक वर्षाचं ते बाळ मोठं गोड होतं. हसत होतं, खेळत होतं. माकड ते पहात होतं. त्याला ते फार आवडलं. आज्जीबाई बाळाचे पापे घेत होती, कुरवाळत होती. ते पाहून माकडाला वाटलं, आपणही त्याचे असेच लाड करावेत. पण बाळाला उचलताना आज्जीबाईनी मारलंबिरलं आपल्याला तर?
माकड लक्ष ठेवून बसलं. बाळानं चेंडू टाकला. तो आणण्यासाठी आज्जीनं बाळाला खाली जमिनीवर ठेवलं आणि चेंडू आणायला गेली. तो क्षण त्या माकडानं बरोबर साधला. पटकन ते बाळाजवळ गेलं. त्याला नीट धरून झेप घेतली आणि झाडावर जाऊन बसलं. आज्जीबाई बघतात तर काय? आपलं बाळ झाडावर… माकडाच्या तावडीत. त्यांनी आरडाओरडा केला. घरातले सगळे बाहेर आले.
बाळ रडू लागलं. पण माकड त्याला आणखी जवळ मिठीत घेत होतं. माकडाला फार मजा वाटत होती. खाली आणखी लोक जमा झाले. माकडाला हुसकू लागले. मग मात्र माकड घाबरलं. पण बाळाला टाकून कसं द्यायचं? त्याला लागलं तर? आज्जीबाईंनी सगळ्यांना मागं सरकायला सांगितलं. माकडानं पटकन खाली येऊन बाळाला अलगद ठेवलं आणि पळून गेलं. पण गावकरी चिडले होते. त्यांनी त्याला तेवढ्यात काठीचा तडाखा दिला, दगड मारले. बिचारं माकड झाडावर गपचूप बसून राहिलं.
काही दिवसांनंतर माकड असंच एका झाडावर बसलेलं असताना समोरच्या घरातला मालक शेवंतीची रोपं आपल्या दारात लावत होता. सगळी रोपं छान एका ओळीत लावून त्यानं रोपांना आळं केलं, पाणी घातलं आणि तो घरात गेला. माकडाला वाटलं, किती छान दिसतायत रोपं! कुठल्या झाडाची असतील बरं? त्याला फार उत्सुकता वाटू लागली. त्या रोपांवर तर काही दिसत नव्हतं… ना फळ ना फूल. माकडाला वाटलं, झाडाच्या खाली लागलं असेल का काही फळ, फूल? आपण उपटूनच बघू यात ना… अ
सा विचार करून माकड खाली उतरलं. कुणाचं लक्ष नाही असं पाहून ते माकड एकेक रोप उपटून बघू लागला. कोणत्याच रोपाला खाली मुळांशिवाय काहीच नव्हतं. त्यानं ती रोपं सगळी टाकून दिली आणि तिथून निघणार इतक्यात त्या मालकानं त्या माकडाला पाहिलं. आपण चांगली लावलेली सगळी रोपं ह्यानं खुशाल उपटून फेकून दिली म्हटल्यावर मालकाचा राग अनावर झाला. त्यानं काठीनं दोनतीन तडाखे त्याला हाणले.
बिचारं माकडं झाडावर जाऊन बसलं. सगळं अंग दुखत होतं. ते रडू लागलं. हळूहळू चालत एका देवळात गेलं आणि त्यानं देवापुढे गाऱ्हाणं घातलं. म्हणाला, “देवा, मी कुणाचं काय वाईट केलं म्हणून हे लोक मला मारतात?’ देव हसला आणि म्हणाला, “वा रे वा! तू बाळाला पळवलंस, बाग उद्ध्वस्त केलीस आणि म्हणतोस, मी काय वाईट केलं?’
माकड म्हणालं, “पण मी कुणाला मुद्दाम त्रास दिला का? त्या बाळाला मी प्रेमानंच जवळ घेतलं ना?’
“ते बाळ तुझं होतं का?’ देवानं विचारलं.
“नाही’ माकड उत्तरलं.
“तू त्यांना विचारलंस का काही? जी गोष्ट आपली नाही, ती खुशाल पळवून न्यायची म्हणजे चोरीच नाही का? त्याचीच तुला शिक्षा मिळाली.’
“रोपं तर फक्त मी पाहिली कशाची आहेत ते!’
“मालकानं ती किती निगुतीनं लावली होती! आणि तू खुशाल ती सगळी रोपं उपटून फेकून दिलीस. तो रागवेल नाही तर काय? कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी जरा विचार करत जा.’ देवानं त्याला समजावलं.
“विचार? कसला विचार?’
“अरे, म्हणजे आपल्याला जे करावंसं वाटतंय, त्यानं कुणाचं नुकसान होईल का? कुणाला त्रास होईल का? याचा विचार नको का करायला? तुझा हेतू पुष्कळ चांगला असेल, पण त्याचा शेवटी दुसऱ्याला त्रासच होणार असेल ते बरोबर नाही.’
“…म्हणजे आधी परिणामांचा विचार करायचा आणि मग कृती करायची?’ माकड गंभीर चेहरा करून विचार करीत म्हणालं.
देव म्हणाला, “अगदी बरोबर! तू असं वागून बघ. इतरांची मनं दुखावली नाहीस तर तुला कधीच कसला त्रास होणार नाही. माझा आशीर्वाद आहे तुला!’
– माधुरी तळवलकर