मला आठवतं, तेव्हा मी गावच्या शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होतो. माझं नाव आधी सांगतो. माझं नाव “खंडू’. आता नावासारखंच नाव ते. माझ्या “खंडू’ नावाचं मला आणि गावातल्या कुणालाच काही वावगं वाटत नव्हतं. जसं एखाद्याचं नाव “दगडू’, “म्हादू’ , “धोंडू’… तसंच माझं नाव खंडू. त्यात नवल करण्यासारखं किंवा वावगं वाटण्यासारखं काहीच नव्हतं. गावच्या वळणाचं, गावात मुरलेलं, मुरून उरलेलं …असं हे माझं नाव. गावातल्या लोकांच्या ओठावर ते सहज रूळलं. पण मी जेव्हा वडिलांसोबत शहरात गेलो तेव्हा मला आपल्या नावात काहीतरी गडबड आहे हे कळलं बरं.
माझं खासगी शाळेत पाचवीच्या वर्गात त्यांनी नाव दाखल केलं. आता शाळेचा पहिलाच दिवस माझा. मी गुपचूपपणे वर्गाच्या शेवटच्या बाकावर एकटाच शांत बसलो होतो. तेवढ्यात मास्तर वर्गात आले. लगेच वर्गातला एक मुलगा सरांजवळ जाऊन घाईघाईने पटकन म्हणाला , “सर आपल्या वर्गात ना, एक नवीन मुलगा आलाय.’ एवढं बोलून त्याने लगेच माझ्याकडे बोट दाखवलं. वर्गातल्या इतर सगळ्या मुलांच्या माना गर्रकन माझ्याकडे वळल्या. मास्तर लगेच माझ्याकडे बघत म्हणाले, “तू आलास का रे नवीन ऍडमिशन? इकडे ये’ मी लगेच मास्तरांकडे गेलो. मास्तर म्हणाले, “हा… काय नाव तुझं?’ मी सहजपणे म्हणालो, “खंडू’. तसा सगळा वर्ग खू खू खू खू करून हसायला लागला. मला कळेना हा काय प्रकार घडला तो? मास्तर म्हणालेच, “मुलांनो खडू आणि खंडू यात अनुस्वराचा फरक. खडू लिहून लिहून संपतो पण हा खंडू दमणारा नाही.
संध्याकाळी बाबा कामावरून येऊन खाटेवर बसलेच होते. मी लगेच त्यांना विचारलेच, “बाबा माझं नाव खंडू म्हणून का बरं ठेवलं हो? बाबा शांतपणे म्हणाले, “अरे, तुझ्या आजीचं आवडतं नाव आहे ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जरी तुला आम्ही नाव दिलं असेल तरी, खरं नाव तुझं तुलाच कमवावं लागेल.’
एकदा आई दुपारच्या स्वयंपाकाच्या कामात अडकली होती. घरात बाकी दुसरे कुणीच नव्हते. मी तिला लाडेलाडे म्हटलं, “ए आई, माझं नाव बदल ना गं!’ तर ती म्हणाली कशी, “बदलू या बरं तुझं नाव. आधी मला स्वयंपाक करू दे.’ मी विचार केला, ठीक आहे. आत्ता होईल तिचा स्वयंपाक, थोडा वेळ वाट पाहूया. तेवढ्यात तिनं मला स्वयंपाक खोलीतून हाका मारायला सुरुवात केली, “खंड्या… ए खंड्या. इकडं आत ये.’ मी आपला धावत स्वयंपाक खोलीत गेलो. म्हटलं, “का चालवलाय, एकसारखा माझ्या नावाचा जप.’ तर ती म्हणाली “एका हाकेत कळतं का तुला कधी? बरं जा पटकन, बाळकोबाच्या दुकानातून गरम मसाला ताबडतोब घेऊन ये.
सगळा स्वयंपाक खोळंबलाय माझा. घरातला गरम मसाला संपलाय. लवकर आण हो आणि हे बघ चांगला पाहून आण बरं.’ मी आपलं पैसे घेऊन धावत पळत बाळकोबाचं दुकान गाठलं. आता आईने गरम मसाला सांगितला होता, म्हणून मी बाळकोबाच्या दुकानात मांडून ठेवलेल्या प्रत्येक मसाल्याच्या पाकिटाला हात लावून पाहिला. पण इथे तर सगळे मसाले गारच. आता नीट पाहून आण म्हटल्यावर नको का नीट पाहायला? मी रिकाम्या हाती घरी परत आलो. घडलेला प्रकार आईला सांगितला. आई कपाळाला हात मारून घेत म्हणाली, “अरे, मसाल्याचं नाव आहे गरम मसाला. जसं तुझं नाव “खंड्या’ आहे ना… अगदी तस्स! आधी नीट वागायला शीक. काही नको तुझं नाव बदलायला. खंड्याचा खंड्याच राहणार तू.’ मला कळेना माझं नाव बदलण्याचा आणि आईने सांगितलेल्या कामाचा काय संबंध आहे ते. पण होतं ते असं होतं.
शेवटी त्या बालवयात माझं नाव मीच बदललं बरं का. त्याचं काय झालं, त्यावेळी वर्षाच्या शेवटी शेवटी वर्गावर इन्स्पेक्शनला मोठ्ठे साहेब आले. माझ्या बाजूला माझ्यासारखाच गावावरून नव्यानेच शाळेत आलेला मुलगा होता. साहेबांनी नेमकं त्या मुलालाच विचारलं, “काय तुझं नाव?’ तो मुलगा म्हणाला, “माझं नाव का, माझं नाव सर्जू’. त्यावर साहेब लगेच म्हणाले, “अरे रे, कसं नाव सांगतोस तू. सर्जू काय सर्जू, अरे
सर्जेराव म्हणावं.’ मग साहेबांनी मला माझं नाव विचारलं. मी आधीचा धडा आठवला. सर्जूचा सर्जेराव झाला. मी लगेच माझं नाव “खंडू’च्या जागी “खंडेराव’ म्हणालो. साहेब खूश झाले. सर्जूला म्हणाले, “याने बघ बरं, कसं व्यवस्थित नाव सांगितलं ते.’ गुरुजींचेही डोळे माझ्याकडे पाहून लकाकले. नंतर साहेबांनी वर्गाला अनेक प्रश्न विचारले. मीच सर्वात जास्त उत्तरे दिली. साहेब माझ्यावर, वर्गावर आणि आमच्या गुरुजींवर जाम खूश झाले. वर्गाला “ए प्लस’ शेरा देऊन ते निघून गेले. गुरुजी प्रसन्न चेहऱ्याने माझ्याजवळ येत वर्गाला म्हणाले, “खबरदार! आता याला कुणी खंडू म्हणाला तर. याचं नवीन नाव सांगा बरं! सांगा.’ सगळा वर्ग एका सुरात म्हणाला, “खंडेराव! खंडेराव!’ वर्गात माझं नवं नामकरण तेव्हा झालं. हे सारं मला, माझं नाव कुणी विचारलं की सहज आठवतं आणि मग माझा मीच खळखळून हसतो.
एकनाथ आव्हाड