– डॉ. मेघश्री दळवी
हवामान बदल म्हटला की बदलते ऋतू, कडक उन्हाळा, चक्रीवादळं अशा गोष्टी डोळ्यांसमोर येतात. पण इतर अनेक मार्गांनी हवामान बदल आपल्या आयुष्यावर परिणाम करतो आहे. त्यातला एक आहे करोनासारख्या महासाथींचा उद्रेक. जानेवारी 2020 मध्ये करोनाच्या बातम्या येऊ लागल्या. ही साथ वेगाने पसरू शकते असे अंदाज व्यक्त झाले. पूर्वी होऊन गेलेल्या अशा साथींबाबत आपण खूप ऐकलं होतं. पण आधुनिक काळात उत्तम आरोग्य सुविधा असताना महासाथ खरोखरच होऊ शकते यावर आपला विश्वास बसत नव्हता. पुढे ही साथ कशी पसरली आणि तिच्यामागची कारणं यांचा बराच ऊहापोह झाला. शक्य तितके उपाय सुचवले गेले.
आता हवामान बदलाने महासाथींचे प्रमाण वाढणार आहे, असे निष्कर्ष समोर येत आहेत. वेगवेगळ्या गटांच्या संशोधनातून दिसून आलं आहे की, हवामान बदलाने अनेक प्रजाती झपाट्याने नवीन प्रजातींच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे रोगांच्या संक्रमणाचा धोका वाढतो आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून साथीचे रोग अधिकवेगाने फैलावतील. त्यांचं महासाथीत रूपांतर होईल. त्यातल्या काही महासाथी अधिक प्राणघातक होऊ शकतात.
एका अभ्यासानुसार, ज्या प्रदेशांमध्ये डेंग्यू आधीच अस्तित्वात आहे, तिथे तापमानात सरासरी एक अंश सेल्सिअस वाढ झाल्यास साथीचा धोका 31 ते 47 टक्क्यांनी वाढतो. मलेरिया, डेंग्यू अशा साथींना कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या जीवनचक्रावर तापमानाचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे उष्ण कटिबंधात तापमानात थोडीशी वाढदेखील झाली, तरी साथींची शक्यता वाढते. उलट शीत कटिबंधात डास वाढलेच नसते अशा ठिकाणी तापमानवाढीमुळे डासांची पैदास होऊ लागली आहे.
साधारणपणे उष्ण कटिबंधात आढळणारे रोग शीत कटिबंधात दिसू लागले, तर तिथल्या नागरिकांना या नव्या रोगांबरोबर लढण्यासाठी आवश्यक प्रतिकारक शक्ती नसते. त्यामुळे रोग घातक ठरू शकतात. दाट लोकसंख्या असलेल्या परिसरात ते जलदगतीने पसरू शकतात. कामानिमित्त जगभरात प्रवास वाढला आहे, त्या प्रमाणात रोगाचा फैलावही वाढू शकतो. हवामान बदलामुळे होणारं माणूस आणि प्राण्यांचं स्थलांतर सोबत स्थानिक आजार घेऊन येतं, हाही मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.
युरोपियन सेंट्रल बॅंकेच्या नोंदीनुसार सुमारे 75 टक्के बॅंक कर्जे हवामान स्थिर असेल अशा भरवशावर अवलंबून असतात. हवामान बदलामुळे येणाऱ्या आकस्मिक संकटांनी ही आर्थिक गणित कोलमडू शकतात आणि मंदीची शक्यता वाढते. इतर विकसित देशांमध्येही अशीच परिस्थिती आहे. करोना महासाथीचे आर्थिक तडाखे अनेकांनी झेलले आहेत.
त्यांना पुढल्या महासाथी पार हवालदिल करून टाकतील. संसर्गाच्या भीतीने एकमेकांना मदत करण्याची शक्यता आणखी कमी होते असा समाजशास्त्रीय निष्कर्ष आहे. तेव्हा हवामान बदलामुळे महासाथी आल्यास जागतिक पातळीवर प्रचंड उलथापालथ दिसून येणार आहेत, यात शंका नाही.