राजकीय विरोधकांना शत्रू समजण्याची वृत्ती वाढत असताना राहुल गांधी यांची वाजपेयी यांच्या स्मारकाला दिलेली भेट म्हणूनच लक्षवेधी. अर्थात ही घटना स्वतंत्रपणे पाहिली तर त्याचे अप्रूप वाटेलही. मात्र, त्याच सुमारासच्या अन्य घटना पाहिल्या तर राहुल यांच्या वाजपेयी यांच्या स्मारकाला दिलेल्या भेटीत सूत्र दिसेल आणि म्हणूनच त्या सूत्राचा वेध घेणे औचित्याचे ठरते.
भारत जोडो यात्रा दिल्लीत पोचल्यानंतर राहुल गांधी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली; तसेच माजी पंतप्रधानांच्या स्मारकांना भेट देऊन त्यांनाही आदरांजली वाहिली. शांतिवन, विजय घाट, शक्तिस्थळ आणि वीरभूमी या अनुक्रमे जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या स्मारकांना राहुल यांनी भेट दिली. हे सर्व माजी पंतप्रधान कॉंग्रेसचेच होते. तेव्हा राहुल यांनी त्यांच्या स्मारकांना भेट दिली यात आश्चर्यकारक काही नाही. माजी पंतप्रधान चरण सिंह यांच्या किसान घाट येथील स्मारकालादेखील राहुल यांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली.
चरण सिंह हे जरी लोकदलचे नेते असले तरी ते पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचेच नेते होते आणि नंतर पंतप्रधान म्हणून त्यांनी 1979 साली नेतृत्व केले ते सरकार इंदिरा गांधी यांच्या कॉंग्रेसने दिलेल्या पाठिंब्यावरच अस्तित्वात आले होते. तेव्हा राहुल यांनी चरण सिंह यांच्या स्मारकाला भेट दिली हाही काही फारशा चर्चेचा विषय ठरला नाही. तथापि “सदैव अटल’ हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाला राहुल यांनी भेट दिली ती मात्र चर्चेचा विषय ठरली. याचे कारण वाजपेयी हे कधीही कॉंग्रेसचे सदस्य नव्हते; ते कॉंग्रेसोद्भव पक्षाचेही सदस्य नव्हते आणि मुख्य म्हणजे ते पंतप्रधान असतानाही त्यांच्या सरकारला कधीही कॉंग्रेसचा पाठिंबा नव्हता. याहून लक्षवेधी भाग हा की वाजपेयी ज्या भाजपचे नेते होते तो पक्ष आता केंद्रात स्वबळावर सत्तेत आहे आणि 2014 नंतर भाजपचा विस्तार आणि कॉंग्रेसचा संकोच हे एकाच वेळेस झाले आहे. तेव्हा राहुल गांधी यांनी वाजपेयी यांच्या स्मारकाला भेट दिली हे अनपेक्षित असेच म्हटले पाहिजे.
राहुल गांधी यांनी “सदैव अटल’ला भेट देऊन वाजपेयी यांना आदरांजली वाहिली त्याच सुमारास बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी वाजपेयी यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. बिहारमध्ये सहा-सात महिन्यांपूर्वी नितीश यांच्या जेडीयू पक्षाने भाजपशी संबंध तोडले आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) हातमिळवणी केली. तेव्हापासून भाजप आणि जेडीयू यांच्या दरम्यान कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपेतर पक्षांचा पंतप्रधानपदाचा सामायिक उमेदवार म्हणून नितीश यांचे नाव चर्चेत आहे. अशा वेळी नितीश किंवा जो कोणी विरोधकांचा चेहरा असेल त्याची स्पर्धा थेट नरेंद्र मोदी यांच्याशी असणार आहे यात शंका नाही. तेव्हा लक्ष्य करायचे तर ते मोदींनाच करायचे ही विरोधकांची व्यूहनीती असू शकते. त्याच व्यूहनीतीचा भाग म्हणून नितीश यांनी वाजपेयी यांच्या केलेल्या स्तुतीकडे पाहिले पाहिजे.
वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कार्यक्रमात बोलताना नितीश यांनी वाजपेयी यांच्या पंत्रप्रधानपदाच्या काळात देशाने मोठी प्रगती केली असे विधान केले. त्यांच्या मंत्रिमंडळात आपल्याला तीन-तीन खाती सांभाळता आली आणि मंत्री म्हणून आपण कोणताही प्रस्ताव घेऊन गेलो की वाजपेयी त्यास मान्यता देत असाही दावा नितीश यांनी केला. अर्थात नितीश यांनी वाजपेयी यांची स्तुती करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. भाजपशी संबंध तोडून महागठबंधन स्थापन झाल्यावर त्यांच्या सरकारने गेल्या ऑगस्ट महिन्यात विश्वासदर्शक ठराव जिंकला तेव्हा केलेल्या भाषणात देखील वाजपेयी यांच्या काळात बिहारमधील ज्या विकासप्रकल्पांना मान्यता मिळाली त्याचे श्रेय आता केंद्रात असलेले मोदी सरकार घेत आहे अशी टीका नितीशकुमार यांनी केली होती. मोदी यांच्या काळात अडवाणी यांची कशी उपेक्षा करण्यात आली त्याकडेही नितीश यांनी लक्ष वेधले होते. नितीश यांचे ताजे विधान त्याच धाटणीतील आहे.
राहुल गांधी यांनी वाजपेयी यांच्या स्मारकाला दिलेल्या भेटीकडे या पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे. वाजपेयी हे जरी जनसंघाचे आणि नंतर भाजपचे नेते होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते तरीही त्यांची प्रतिमा ही एका उदारमतवादी नेत्याची होती हे नाकारता येणार नाही. त्या उलट लालकृष्ण अडवाणी किंवा मुरली मनोहर जोशी यांची प्रतिमा ही कट्टर हिंदुत्ववादी नेत्याची होती. त्यावेळी वाजपेयी आणि अडवाणी अशी तुलना भाजपचे विरोधक करीत. आता भाजपमध्ये मोदी आणि शहा यांचेच वर्चस्व आहे आणि त्या तुलनेत वाजपेयी यांच्या प्रतिमेशी सुसंगत नेता नाही. तेव्हा भाजपविरोधकांना मोदी यांची तुलना वाजपेयी यांच्याशी करण्यावाचून गत्यंतर नाही आणि ही तुलना करण्यामागचे कारण देखील राजकीयच आहे हेही लपलेले नाही. तेव्हा राजकारणात काहीही निर्हेतुक नसते हे येथे अधोरेखित होते. मोदींना खिंडीत गाठण्यासाठी विरोधकांना आयुध म्हणून वाजपेयी यांची प्रतिमा उपयुक्त वाटत असावी हाच त्याचा अर्थ.
अर्थात राहुल यांच्या वाजपेयी स्मारकाला दिलेल्या भेटीला कॉंग्रेसमधूनच गालबोट लागले. वाजपेयी यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट कॉंग्रेस नेते गौरव पान्धी यांनी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी केले. पान्धी हे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयाशी संबंधित आहेत आणि अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे समन्वयक आहेत. राहुल यांच्या प्रस्तावित भेटीअगोदरच पान्धी यांनी असे ट्विट केल्याने खळबळ माजणे स्वाभाविक होते; कारण कॉंग्रेसची याबाबत नक्की भूमिका काय यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आपण भारत जोडो यात्रेत देश जोडायला निघालो आहोत अशी भूमिका राहुल आणि त्यांचे सहकारी मांडत आले आहेत; असे असताना कॉंग्रेसमधूनच वाजपेयी यांना लक्ष्य करणारे स्वर निघाल्याने वाद निर्माण झाला.
अर्थात पान्धी यांनी नंतर आपले वादग्रस्त ट्विट हटविले हे खरे, पण त्यामुळेच वाजपेयी यांच्या स्मारकाला भेटीमागचा उद्देश कॉंग्रेसचा उदारमतवाद हा आहे की व्यूहात्मक आणि राजकीय आहे हा प्रश्न मात्र उत्पन्न झाला. याच सुमारास भाजपचे माजी नेते आणि आता तृणमूल कॉंग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहून जी-20 चे अध्यक्षपद भारताला मिळाल्यावरून जो गवगवा चालू आहे त्यावर टीका केली. असे अध्यक्षपद वाजपेयी यांच्या कार्यकाळात देखील भारताला मिळाले होते; पण त्यावेळी गवगवा करण्यापेक्षा शांतपणे पण प्रत्यक्ष काम करण्यावर भर अधिक होता असा टोला सिन्हा यांनी लगावला. अर्थात वाजपेयी यांच्याविषयी हे सर्वजण जी विधाने करीत आहेत त्यात तथ्य नाही, असे नाही. मात्र वाजपेयी यांच्या प्रतिमेचा उपयोग भाजपलाच आणि मुख्यतः मोदींनाच कोंडीत पकडण्यासाठी केला जात आहे, हेही तितकेच खरे.
कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांनी वाजपेयी यांच्या स्मारकाला दिलेल्या भेटीत कोणतेही राजकारण नाही असे स्पष्टीकरण देतानाच वाजपेयी हे उदारमतवादी नेते होते; विरोधकांबद्दल त्यांनी कधीही आकस बाळगला नाही; 1962 साली चीनने भारतावर केलेल्या आक्रमणावरून तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना पत्र लिहून खासदारांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली होती आणि त्या पत्रावर तेव्हा नवोदित असणारे खासदार वाजपेयी यांचीही स्वाक्षरी होती; एवढेच नव्हे तर नेहरूंनी ती मागणी मान्य केली होती आणि आता मात्र चीनच्या मुद्द्यावर संसदेत चर्चाही होत नाही या बाबी अधोरेखित केल्या आहेत. जयराम रमेश यांनी सुमारे चार वर्षांपूर्वीही दिलेल्या एका मुलाखतीत वाजपेयी हे सभ्य, सुसंस्कृत आणि उदारमतवादी, सहिष्णू नेते होते; नेहरू युगात ते वावरले आणि त्याकाळची अनेक मूल्ये त्यांनी अंगिकारली होती असे सांगून मोदी हे त्याच्या बरोबर उलट आहेत असे म्हटले होते. राहुल यांच्यापासून नितीश यांच्यापर्यंत अनेकांनी वाजपेयी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत त्यात तोच धागा आहे. भाजपने कॉंग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी नेहेमीच कॉंग्रेसच्याच नेत्यांच्या प्रतिमेचा आयुध म्हणून उपयोग केला.
कधी नेहरू विरुद्ध सरदार पटेल अशी; कधी नेहरू विरुद्ध नेताजी बोस अशी विभागणी केली; मात्र त्यामागील उद्देश हा प्रकर्षाने नेहरू आणि नेहरू-गांधी कुटुंबीय यांना लक्ष्य करण्याचा होता आणि आहे. सर्व प्रमाद नेहरूंकडून घडले; पण पटेल आणि बोस यांच्यासारख्यांनी देशाला सावरले. मात्र, कॉंग्रेसने त्यांची नेहेमीच उपेक्षा केली अशी मांडणी भाजप करीत आला आहे आणि आता त्यास धार चढली आहे. तथापि वाजपेयी यांना मात्र नेहरू यांच्याविषयी आदर होता आणि त्यांनी नेहरूंच्या धोरणांवर प्रसंगी कठोर टीका केली तरी त्यांच्याविषयी कधी आकस बाळगला नाही ना तो सार्वजनिकरीत्या कधी प्रकट केला. किंबहुना आणीबाणीनंतरच्या निवडणुकांत कॉंग्रेसचा धुव्वा उडाला आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर वाजपेयी परराष्ट्र मंत्री असताना “सूर्यापेक्षा वाळू तापते’ या न्यायाने काही अधिकाऱ्यांनी वाजपेयी यांच्या दालनातील नेहरू यांचे छायाचित्र हटविले होते तेव्हा वाजपेयी यांनी ते पुन्हा त्या जागेवर लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.
ज्या नेहरूंना भाजप सातत्याने टीकेचे लक्ष्य करतो त्याच नेहरूंविषयी भाजपचेच शीर्षस्थ नेते राहिलेले वाजपेयी यांना कसा आदर होता यावर भर देण्याचा भाजपविरोधकांचा हा प्रयत्न आहे. वाजपेयी यांच्या विधानांबद्दल किंवा त्यांनी घेतलेल्या भूमिकांबद्दल दुमत व्यक्त करणे भाजपला शक्यही नाही आणि त्याच कोंडीचा लाभ उठविण्याचा कॉंग्रेस आणि अन्य पक्षांचा इरादा असावा. त्यातही 2002 च्या गोध्रा दंगलींच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी पंतप्रधान असणारे वाजपेयी यांनी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणारे मोदी यांना “राजधर्म’ पाळण्याची जी जाहीर समज दिली होती त्यावरही कॉंग्रेसचा भर असणार. तेव्हा राहुल यांनी वाजपेयी यांच्या स्मारकाला भेट देण्यामागे वाजपेयी यांची प्रतिमा आणि मोदी यांची प्रतिमा कशी तफावत असणारी आहे या भेगा दाखविण्याचा इरादा असल्यास नवल नाही.
वाजपेयी यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी मधुर संबंध होते हेही अमान्य करता येणार नाही. तथापि हेही लक्षात ठेवले पाहिजे की वाजपेयी हे ज्या सरकारचे नेतृत्व करीत होते ते आघाडी सरकार होते आणि बिगरकॉंग्रेसवादातूनच ती आघाडी साकारलेली होती. आघाडी सरकार असल्याने भाजपला 370 वे कलम, राम मंदिर आणि समान नागरी कायदा हे खास भाजपचे मुद्दे बासनात बांधून ठेवावे लागले होते. आता भाजपकडे स्वबळावर बहुमत आहे आणि कोणत्याही मित्रपक्षाची भाजपला निर्णय घेण्यासाठी अथवा धोरणे राबविण्यासाठी आवश्यकता नाही. तेव्हा वाजपेयी आणि मोदी यांच्यातील फरक दाखविताना कॉंग्रेस, जेडीयू, तृणमूल यांच्या नेत्यांनी तोही फरक लक्षात घ्यायला हवा.
वाजपेयी यांच्या काळातही भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून हे मुद्दे कधी वगळले नव्हते हेही ध्यानात ठेवले पाहिजे. अर्थात तरीही नेहरू विरुद्ध पटेल किंवा तत्सम प्रतिमास्पर्धा करून भाजप कॉंग्रेसला कोंडीत पकडण्याचा डावपेच रचत आला आहे; तोच प्रयोग आता भाजपविरोधक करू पाहत आहेत असेच म्हटले पाहिजे. तथापि हे करताना आपली भूमिका ही खरोखरच सहिष्णुतेचा पुरस्कार करणारी आहे का की केवळ सोयीस्कर किंवा व्यूहात्मक आहे यावरही भाजपविरोधकांनी लक्ष द्यायला हवे.
मोदींची कोंडी करण्याच्या किंवा भाजपच्याच डावपेचांची नक्कल करण्याच्या मोहात कॉंग्रेस स्वतःच जाळ्यात अडकणार नाही ना हेही तपासणे गरजेचे. वाजपेयी यांच्या बाबतीतही समग्रतेपेक्षा सोयीस्कर तेवढेच घेताना आपण आपल्या भूमिकांशी प्रामाणिक आहोत ना याचीही पडताळणी या नेत्यांनी आणि पक्षांनी करायला हवी. वाजपेयी यांच्या प्रतिमेचा मानदंड उभा करून मोदींना आरसा दाखविण्याचा; कदाचित भाजपमधील काहींना मोदींच्या विरोधात पक्षांतर्गत भूमिका घेण्यास उद्युक्त करण्याचा हा डावपेच असू शकतो. त्याचा राजकीय लाभ भाजपविरोधकांना होतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. परंतु आता वाजपेयी यांची अनेकांना पडलेली भुरळ ही “व्यूहात्मक’ आहे हे या सगळ्या गावगव्यात विसरता येणार नाही.
– राहूल गोखले