पुढल्या वर्षी सहस्रचंद्र दर्शन कार्यक्रम ठरवावा या वयाची. तो महिनाभरापूर्वी नोकरीतून निवृत्त झालेला. ती त्याला बाळ म्हणत होती तर तो तिला आई म्हणून पुकारत होता. काठी टेकत ती त्याच्या खोलीत आली तेव्हा तो हातातली सिगारेट विझविण्याचा बेतात होता. तिने विचारलं, “काय करतोयस?’
तो म्हणाला, “सविता गेलीय माहेरी तिच्या आईकडं. सौरभ परीक्षा संपलीय म्हणून गेलाय ट्रेकला. वाचायला एक पुस्तक घेतलं खरं, पण मन रमत नाहीय. मी काय करतोय असं का विचारलंस, काही हवंय का?’
“एकटा दिसलास त्यामुळं विचारलं. फ्रीजमध्ये काय आहे?’
“काही नाही, वाटीभर श्रीखंड आहे, दोन भाज्या, दुधाच्या पिशव्या.’
“ठीक आहे.’
तासभर बसून दहा वाजायला आले. खूपवेळ बोलायचा विषय रोखून धरल्यानं तिच्या चेहऱ्यावर ताण आलाय हे त्याला जाणवलं. अनुमती दिल्यासारखं त्यांनी डोकं हलवलं.
“बाळ, तेव्हा आम्ही सातारला होतो. मी जेमतेम सतरा आठराची. नुकतीच मॅट्रिक बऱ्या मार्कांनी पास झालेली. आईला मध्ये घालून काम होणार नाही असं वाटलं म्हणून तुझ्या आजोबांना म्हटलं की भाऊ, मला अजुनी शिकायचंय. मी कॉलेजला जाऊ का? त्यावर भाऊंनी माझ्याकडं आणि आईकडं रोखून पाहिलं आणि मान गदागदा हलवली. म्हणाले तुझ्या मागं दहावीला असणारा भाऊ आहे आणि त्यापाठोपाठ दोन बहिणी. माझ्या तीन बहिणींची लग्न करवून देऊन मी संसार वाढवून ठेवलाय. वनखात्यात हेड क्लार्क म्हणून कारकुनी करतोय. तुझी आणखी शिकायची इच्छा चांगली आहे, पण मला नाही त्यासाठी काही करणं शक्य होणार. एक करू शकू… एखादा चांगला मुलगा पाहून तुझं लग्न करून देतो. तुझ्या सासरी चालत असेल आणि त्यांची ऐपत असेल तर शिकवतील ते तुला. हा विषय संपलाय. जा, आईकडून पोळ्या शिकून घे.
हिरमुसली होऊन दोन महिने झाले होते. एक दिवस भाऊ मागं परसात सरपण फोडत होते. दार वाजल्यासारखं वाटलं म्हणून उघडलं. दारात एक बावीस तेवीस वयाचा मुलगा उभा. हातात एक पॅड. किंचित चुरगाळलेले कपडे आणि जाणीवपूर्वक केसांचा पाडलेला भांग. उंबऱ्याकडं पाहात तो म्हणाला, देशपांडे साहेब आहेत का? एक टपाल अर्जंट दाखवायचं आहे त्यांना.
तो काय म्हणतोय हे माझ्या लक्षात येऊनही भाऊंना हाक मारायची सोडून मी उष्ट्या उंबऱ्याकडं बघत राहिले. पंच्यांनी घाम पुसत भाऊ बाहेर आले. अरे, राजोपाध्ये. काय काम काढलंत? त्यांनी काम सांगायला सुरुवात केली तेव्हा त्याला थांबवत भाऊंनी मला आत जायची खूण केली. मी आत गेले आणि फट ठेवून दार लोटून घेतलं. राजोपाध्ये गेले आणि त्यापाठोपाठ माझं हिरमुसलेपणही.
आठ दिवसांनी पुन्हा राजोपाध्ये आले. भाऊंनी डोळे मोठे करायच्या आतच मी स्वयंपाकघरातील दाराआड गेले. यावेळी फट अंमळ जास्त रुंद झाली होती.
त्यादिवशी राजोपाध्ये आले तेव्हा भाऊ घरी नव्हते. भाऊ दहा मिनिटांत आले तोवर राजोपाध्यांना वडील नाहीत, धाकटी बहीण आहे आणि स्वतःच्या वाड्यातील आठ बिऱ्हाडकरूंच्याकडून बरं भाडं येतं हे समजलं. मला पुढं शिकायची इच्छा आहे पण ओढग्रस्तीच्या संसारात तुमच्या देशपांडेसाहेबांना ते शक्य होत नाही हे मी त्यांच्या कानावर घातलं.
भाऊंनी राजोपाध्यांना कागद परत केले आणि म्हटलं की यापुढं कागद घरी आणून द्यायची गरज नाही. राजोपाध्ये जाताच भाऊंनी मला फैलावर घेतलं. या गोष्टीला पंधराच दिवस झाले आणि भाऊ लाटकरांकडून पेढे घेऊन आले. भाऊंची बदली त्यांना हवी तशी पुण्याला झाली होती.
पुणं भाऊंना चांगलंच मानवलं. एका इंजिनियर मुलाचं स्थळ कुणीतरी सुचवलं. काळ्यासावळ्या पण तरतरीत मुलाला मला काहीही न विचारता होकार कळवल्यावर तीन महिन्यांत आमचं लग्न झालं. दोन वर्षात तुझ्यासारखा बापाच्या वळणावर गेलेला मुलगा झाला. तुझ्या बाबांनी खूप जीव लावला मला. सगळ्या अर्थानी सुखी संसार झाला आमचा. दहा वर्षामागं ते गेले ते खूप छान आठवणी मागं ठेवून. भाऊंचं घर जितकं कर्मठ तितकं हे आधुनिक विचारांचं. भाऊ म्हटले तसंच झालं. मी बाहेरून परीक्षा देऊन बीए झाले. तीस वर्षं नोकरी केली आणि आता तुझा भरला संसार पाहातेय.
“आई, पण हे सगळं तू मला आता का सांगतीयस?’
“अं अं .. आज पेपर वाचत होते. या वयात निधनवार्ता या सदराकडं हटकून लक्ष जातं. एक फोटो होता. सातारा येथील दत्तात्रेय राजोपाध्ये यांचं वृद्धापकाळानं निधन. मघा मी उल्लेख केलेल्या राजोपाध्यांचं नाव दत्तात्रेय होतं का ठाऊक नाही. या वयातील फोटोमुळं तीदेखील खात्री करून घेता येत नाही. चल, थोडं जेवून घेऊ.’
त्यांनी आईकडं पाहिलं. तो पहातोय हे लक्षात येताच तिने हसायचा प्रयत्न केला. त्याचं काळीज तिच्या डोळ्यातील चुकार अश्रूंचा वेध घेतं होतं. त्याला नातं बदलून घ्यावंसं वाटलं. आपल्यातील बापानं अश्राप पोरीला जवळ घ्यायला हवंय का?
त्यांनी प्रश्न विचारलाच नाही.
– दीपक पारखी