महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा 23 एप्रिल 2023 रोजी शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती दिन. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
महाराष्ट्राला समाजसुधारकांची मोठी परंपरा असून त्यांच्या अतुल्य योगदानामुळे महाराष्ट्र पुरोगामी झाला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीतले महत्त्वाचे अग्रगण्य नाव म्हणजे कर्मवीर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे होय. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने भारतीय अस्पृश्यतेचा त्यांनी अभ्यास केला.
बडोदा नरेश सयाजीराव महाराजांनी धर्मशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांना परदेशात पाठवले. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कराराप्रमाणे बडोद्याची शिष्यवृत्ती परत करणे बंधनकारक होते. मात्र, अस्पृश्य समाजासाठी शिंदे कार्य करीत आहेत म्हटल्यावर महाराजांनी त्यांची शिष्यवृत्ती माफ केली. महर्षींचे हे कार्य त्यांच्या अंतःकरणातील धार्मिक वृत्तीतून निर्माण झाले होते. ही आध्यात्मिक दृढ धर्मश्रद्ध भावना त्यांच्यात आजोबा व माता-पित्यांमुळे आली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. त्यांचा व्यासंग धर्मशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र अशा सर्व विषयांना कवेत घेणारा असल्यामुळे त्यांनी उभ्या केलेल्या चळवळी या ठोस वैचारिक पायावर उभ्या झालेल्या आढळतात. “भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा धर्मग्रंथ त्यांनी प्रचंड व्यासंगाने संशोधन पूर्ण अभ्यासाने लिहिला.
अस्पृश्य समाजातील बऱ्याच जाती या प्राचीन काळी राज्यकर्त्या जमाती असाव्यात असा निष्कर्ष त्यांनी काढला. 1906 मध्ये मुंबईत “डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी’ची स्थापना करून अस्पृश्यांसाठी शिक्षणकौशल्य, अन्याय रूढीचे निर्मूलन, जातिभेद निवारण, स्त्रियांची विटंबना, देवदासी प्रथा, मुरळी प्रथा, धर्माच्या नावावर चाललेल्या अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी शिक्षणाचे शस्त्र उपसले. महर्षींच्या वैचारिक जडणघडणीत युरोपातल्या उदारमतवादी, बुद्धिवादी आणि मानवतावादी आधुनिक मूल्यांचा मोठा प्रभाव जाणवतो.
अखिल भारतीय राजकारणात स्वातंत्र्याला अधिक महत्त्व देण्यात आले होते. कारण, स्वातंत्र्य मिळाल्यावर आपणास सामाजिक सुधारणा करता येतील, असा एक मतप्रवाह होता. त्यामुळे अशा व्यक्तींच्या दृष्टीने अस्पृश्यता निवारणाला दुय्यम स्थान होते. महर्षी शिंदे यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीने अस्पृश्यता निवारण हे ध्येय म्हणून कार्यक्रमात स्वीकारले. त्यांच्या प्रयत्नामुळे हा प्रश्न राष्ट्रीय चळवळीच्या व्यासपीठावर गेला व त्याला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले. 1917 च्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष ऍनी बेझंट यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास केला. त्यास महर्षी शिंदेंची तपश्चर्या कारणीभूत होती.
महर्षी शिंदे ऊर्फ अण्णासाहेबांचे मोठेपण म्हणजे या कार्यासाठी त्यांनी आपणहून गरिबी पत्करली होती. ज्या दारिद्य्राशी झगडत त्यांना उच्च शिक्षण घ्यावे लागले त्याच्याशी झगडत त्यांना आपली सेवा कार्य पार पाडावी लागली. वस्तुतः बडोदे दरबारातून त्यांना केव्हाही राजाश्रय मिळाला असता. अनेकदा स्वतः महाराजांनी त्यांना बोलावलेही होते. पण त्यांनी त्यास विनम्रपणे नकार दिला. मिशनमधून मिळू शकणारी पेन्शनही त्यांनी नाकारली. अल्प वेतनाची नोकरीही सोडली आणि शिंदे कुटुंबीय मित्राकडे वेताळपेठेत राहावयास गेले. यावेळी महर्षी शिंदे वयाच्या पन्नाशीत होते. केवढा अभूतपूर्व त्याग. स्वतःचे घर नसावे? कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन नसावे? महर्षींचा कार्यानुभव व स्वानुभव मोठा होता; पण फारच थोड्यांनी त्याचा फायदा करून घेतला.
1930 मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत ते येरवडा तुरुंगात गेले. तुरुंगातच त्यांची प्रकृती बिघडली. मृत्यूपर्यंत घरी बिछान्यावर पडून राहिले. या विश्रांत व निवृत्तीच्या काळातच त्यांना वैफल्य वाट्यास आले. असे असतानाही यश-अपयश व मानपान हे सर्वसारखे माणून ते आपल्या मनाचा तोल सांभाळत राहिले. 1948 मध्ये “महाराष्ट्राचा एक कर्मवीर’ या शीर्षकाचा “दैनिक मराठा’मध्ये आचार्य अत्रेंनी अग्रलेख लिहिला आणि त्यांच्या कार्याचे पुण्यस्मरण महाराष्ट्राला करून दिले.
महर्षी अण्णासाहेब शिंदे म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा मिलाफ असलेले, सार्वजनिक जीवनासाठी सारे आयुष्य वाहणारे, स्तुती व निधीच्या पलीकडे गेलेले आणि संसाराला धर्म साधनेचे कर्तव्य मानणारे महर्षी होते. त्यांच्या सामाजिक कार्याचीच उपेक्षा नव्हे तर त्यांच्यामधील विद्वानाचा, संशोधकाचा, भाषातज्ज्ञाचा, इतिहासकाराचा सन्मान त्यांच्या हयातीत हवा तसा झाला नाही किंवा त्यांच्या लेखनाची गंभीर दखल त्याकाळी कुणी घेतली असे दिसत नाही. गं. बा. सरदार “महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी’मध्ये म्हणतात, “आपल्या महाराष्ट्रीयांचा स्वभाव कसा आहे, आपण गुणांची पूजा नाही तर व्यक्तीचे पूजक आहोत.
एखाद्या व्यक्तीच्या मागे आम्ही लागलो म्हणजे तिला आभाळापर्यंत उंच चढवतो, तिच्या पायावर लोटांगण घालतो. तिला जयजयकाराने गुदमरून टाकतो. तिच्या मूर्ती स्थापून त्यांची विटंबना करतो आणि ज्यांचे गुण आपण खरोखरच अनुसरण्यासारखे असतात अशा इतर अनेक थोर कार्यकर्त्यांना आपण विसरतो, इतके का त्यांचे नामोनिशाणही शिल्लक ठेवत नाही. आमच्या राष्ट्रीय मूर्खपणाची ही एक खूण आहे.’
जी गोष्ट महर्षी शिंदे यांच्याबाबत झाली तीच महात्मा फुलेंबाबत घडलेली दिसते. फुलेंच्या मृत्यूनंतर काही दशकात का होईना त्यांचे थोरपण महाराष्ट्रासमोर आणि नंतर देशासमोर आले. ते स्वीकारलेही गेले. मात्र, महर्षींच्या बाबतीत ते आजही घडलेले दिसत नाही. त्यांनी मांडलेल्या सिद्धांताविषयी आणि लोकोत्तर कार्याविषयी महाराष्ट्र अनभिज्ञ राहिला. अस्पृश्योद्धारकासंबंधी त्यांच्या वैचारिक योगदानाबद्दल आजही महाराष्ट्राला फारशी कल्पना नाही.
बडोद्यातील मराठा समाजाने महर्षींचा सत्कार आयोजित केला खरा, परंतु कार्यक्रमात विरोधी सूर निघू लागला. मराठा समाजाच्या खर्चातून शिंदे यांचे शिक्षण झाले असूनही त्यांनी त्या समाजासाठी काहीही न करता प्रार्थना समाजासाठी काम करणे ही गोष्ट काही बरी नाही, असे त्यातील काहींचे म्हणणे पडले. म्हणजे स्वसमाजाकडूनही त्यांच्या कार्याची कदर झाली नाही. 1934 मध्ये मुंबईत या सामाजिक संस्थांनी महर्षी अण्णासाहेब शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा केला. त्यांना मानपत्र दिले. तेव्हा महर्षी म्हणाले,
तुम्ही इतका खटाटोप करून माझ्यावरील प्रेमाचे प्रदर्शन केले तेव्हा मानपत्र न स्वीकारणे म्हणजे माझ्यावर कृतघ्नपणाचा दोष आला असता. म्हणूनच मला मान वाकवावी लागली; पण या मानपत्रामुळे मी तुमचा केव्हाही निंदा राहणार नाही. मी जनाची ऐकेन पण मनाचेच करेन. अस्पृश्यता अजून नष्ट झाली नाही व ती नष्ट करण्याचा आपण कसून प्रयत्न कराल या अटीवर मी या मानपत्राचा स्वीकार केला. आपल्या कार्यावर अढळ श्रद्धा असणारा त्यापुढे मानमरातब, सत्कारही क्षुल्लक मानणारा हा महामानव होता. अशा ऋषितुल्य महर्षी शिंदेंच्या 23 एप्रिल 2023 रोजी शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
– प्रा. मधुकर धिवार