आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात मान-अपमानाचे प्रसंग येतच असतात. अशा प्रसंगांना नेमके कसे सामोरे जावे ज्यामुळे आपले काही नुकसान तर होणार नाही आणि आपले ध्येय साध्य करणे सुकर होईल नेमके याच विषयी थोडेसे…
मान अपमान हा आपल्या प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. आपण सगळ्याच जणांनी मान-अपमानाचा सामना केलेला असतो. बऱ्याच जणांना सरकारी अथवा खासगी पुरस्कार प्राप्त होतात, मोठा मानसन्मान होतो. बऱ्याच जणांच्या हातात बेड्या ठोकल्या जातात किंवा गुन्ह्यासाठी शिक्षा होते. अशा व्यक्तींचा त्यांच्या आयुष्यात झालेला हा मोठा अपमान असतो.
बऱ्याच वेळा आपण आपल्या चुकीच्या वागणुकीने अपनामाला सामोरे जातो. तर चांगल्या वागणुकीने मान-सन्मानास प्राप्त होतो. या उलट बऱ्याच वेळा अन्य व्यक्तीच्या उद्दामपणामुळेही आपणास अपमान सहन करावा लागतो. आपल्या वागण्यात काहीच चुकीचे नसते पण दुसरी व्यक्ती मात्र आपला अपमान करत असते. आपल्याला अनेक विचित्र अनुभवही येत असतात. हे सर्व आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटकच आहेत.
हा मानापमानाचा खेळ जरी होत असला तरी आपण आपल्याकडून इतर कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणी आपला सन्मान करणे हा आपल्या हातात नाही. पण “आपण कोणाचाही अपमान करू नये’ हे तर आपल्या हातात आहे, मग ते तर करूया. बऱ्याच प्रसंगी अनेक व्यक्ती हातात अधिकार असले, बळ असले की इतर व्यक्तींना कमी लेखावयास लागतात. समजा एका संस्थेतील अधिकारी आहेत. त्यांचे अधिकार फक्त त्या संस्थेपुरतेच मर्यादित असतात. त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर ती अधिकारी व्यक्ती एक सामान्य व्यक्तीच असते. अशा प्रसंगी रस्त्यावरील एक अतिसामान्य व्यक्ती त्या संस्थेतील अधिकाऱ्याचा अपमान करू शकते आणि ती अधिकारी व्यक्ती त्याचे काहीच बिघडवू शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी.
आपण मात्र आपल्या हातात अधिकार असो वा नसो. आपण एक व्यक्ती म्हणून सभोवतालच्या सर्वच व्यक्तींचा यथा योग्य आदर राखावयासच हवा. आपण म्हणजे वेगळे कोणी, खूप मोठे कोणीतरी आहोत असा गैरसमज काढून टाकवयास हवा. जसा आपल्याला आत्मसन्मान आहे तसाच इतरांनाही त्यांचा आत्मसन्मान आहे हे विसरता कामा नये. आपण अधिकारी आहोत आणि आपल्या हाताखाली शिपाई काम करत आहे, तर तो शिपाईसुद्धा सर्वात आधी एक माणूस आहे आणि नंतर तो शिपाई आहे हे लक्षात घ्यावे. शिपायाचा आदर करावयाचा म्हणजे त्या शिपायाशी बोलताना एक सामान्य व्यक्तीशी बोलतो तसे अगदी सामान्य शब्दातच बोलावयाचे. आपल्याकडील अधिकारामुळे तो शिपाई आपण जरी अपमानास्पद वागणूक दिली तरी शांतपणे ऐकून घेईल. त्यावेळी आपण विनाकारणच स्वतःला अधिकच मोठे झाल्याचे समजू लागू. तो शिपाई त्याला शक्य असेल त्या सर्व मार्गांनी आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकेल. अर्थात हे सर्व व्यक्ती सापेक्ष आहे. कोणी एखादा शिपाई झालेल्या अपमानाबाबत दुर्लक्ष करील आणि शांत बसेल.
काही प्रसंगी झालेल्या अपमानाचा बदला कोणी अनेक वर्षांनी घेतल्याचीही उदारहणे आहेत. त्यामुळे आपण आपले इतरांप्रती वागणे-बोलणे जर व्यवस्थित ठेवले तर भविष्यातील संभाव्य अडचणी आपण आपोआपच कमी करत असतो. आपण आज प्रभावशाली असताना जे काही कृत्य करत असतो त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम आपल्याला त्या त्या तीव्रतेनुसार आपल्याला भविष्यात मिळत असतात. कोणाचा अपमान करून आपल्याला कोणताही लाभ मिळत नसतो. आपल्याला मिळतो तो फक्त आसुरी आनंद! इतिहासात जरी जर-तर ला स्थान नसले तरी भविष्यात मात्र असते. म्हणूनच जर-तर चा विचार करून घाट्याचा सौदा करावयाचा की नफ्याचा हे ज्याचे त्याला जास्तच चांगले कळते.
मान-अपमान हा व्यक्तीसापेक्ष असतो. एखाद्या व्यक्तीला एखादा शब्द खूप जाचू शकतो, तर तोच शब्द इतर एखाद्या व्यक्तीला जाचणार नाही, आपले एखाद्या व्यक्तीशी कसे संबंध आहेत यावरही अवलंबून असते. आपल्या मित्रपरिवारात एकमेकांशी वागताना बोलताना कोणतीही सभ्यता न पाळता जरी बोललो, वागलो तरी काही बिघडत नाही, असेच वागणे-बोलणे सर्वत्र चालेलच असे नाही. आपल्या वागण्या-बोलण्यात आत्मविश्वास दिसला पाहिजे. त्याचबरोबर उद्दामपणा दिसता कामा नये याचीही काळजी आपण घेतली पाहिजे.
अपमानाच्या प्रसंगातून जाताना त्याची परतफेड करण्यात आपण आपली ऊर्जा, वेळ हे सर्व वाया घालवायचे की आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावयाचे यामध्ये आपण “आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावयाचे’ हाच पर्याय निवडायचा. कोणत्याही परिस्थितीत ध्येयापासून आपले लक्ष विचलित होऊ द्यावयाचे नाही. आयुष्यात पुढे जेव्हा केव्हा सवड मिळेल त्यावेळी झालेल्या अपमानाच्या परत फेडीबाबत विचार करायला हरकत नाही.
आपण आपल्या मन मंदिराच्या गाभाऱ्यात बसून ज्या प्रमाणे संत मंडळींना सोने व माती हे समानच असते, आणि त्यांची मती भ्रष्ट होत नाही, त्याचप्रमाणे आपणही आयुष्यातील मान-अपमानामुळे विचलित होणार नाही याची काळजी घेत आपल्या स्थिर मतीचे पुष्प आपल्या मनोदेवतेस अपर्ण केले म्हणजे आयुष्यातील बरेच प्रश्न सुटतील आणि आपले ध्येय गाठणे सुकर होईल यात शंका नाही.
– अनिकेत भालेराव