तेलंगणामध्ये सत्तेची हॅट्ट्रिक साधण्याच्या महत्त्वाकांक्षेने कसोशीने प्रयत्न करणाऱ्या केसीआर राव यांना आपली वाट सुकर नसल्याचे यापूर्वीच लक्षात आले आहे. या राज्यात मतदार कॉंग्रेस पक्षाला परत सत्तेत आणण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. आतापर्यंचा ट्रेंड पाहता मतदारांना कॉंग्रेसच्या रूपाने एक पर्याय मिळाल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेसला मोफत योजनांचा लाभ मिळू शकतो आणि त्या बळावरच त्यांना संजीवनी मिळू शकते. बीआरएस विरुद्ध असलेल्या नाराजीचा लाभ हा कॉंग्रेस पक्षाच्या झोळीत पडू शकतो. तेलंगणात 30 नोव्हेंबरला मतदान होणार असून त्याची मतमोजणी 3 डिसेंबरला होईल. राजकारणात एक आठवडा देखील खूप असतो. पुढे काहीही होवो, पण सध्या तेलंगणाचे राजकारण वेगळ्या वळणावर पोहोचले आहे.
केंद्रातील भाजपच्या सरकारला विरोध करणारे नेते जेव्हा बदलाबाबत बोलत असतात तेव्हा त्यांच्यासमोर एकच प्रश्न असतो आणि तो म्हणजे भाजपानंतर कोण? हे एक सत्य आहे की भाजपच्या लोकप्रियतेने त्यांच्या राजकीय स्पर्धक पक्षांना मागे टाकले आहे. त्यामुळे साहजिकच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. केंद्रात पर्याय कोण? असा प्रश्न अन्य पक्षातील श्रेष्ठींना विचारला जातो आणि त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही; परंतु तेलंगणातील मतदारांना सत्तेत असलेल्या बीआरएसविरुद्ध एक उत्तर मिळाले आहे, ते म्हणजे कॉंग्रेस.
बीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी 2014 मध्ये या पक्षाची स्थापना केल्यानंतर तेलंगणच्या राजकारणावर छाप पाडली. गेल्या वर्षांपर्यंत ते अजिंक्य वाटत होते. ते राजकीय भवितव्याबाबत एवढे ठाम होते की त्यांनी आपल्या पक्षाचे नावही बदलले. त्यांनी टीआरएस तेलंगण राष्ट्र समितीच्या जागी बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्रसमिती म्हणण्यास सुरुवात केली. वाढत्या महत्त्वाकांक्षेतून ते आपला मुलगा टी. रामाराव यांच्या हाती सत्ता सोपवून राष्ट्रीय राजकारणात तयार होण्यासाठी उत्सुक झाले आहेत. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा करण्यासांठी राष्ट्रीय माध्यमांना पान-पानभर जाहिराती दिल्या. तूर्त त्यांचा पक्ष आता बचावात्मक भूमिकेत आहे आणि त्यांचे नेते कॉंग्रेस पक्षावर बेछूट आरोप करत आहेत तसेच जनतेत प्रचार मोहीम राबवत आहेत.
केसीआर नावाने लोकप्रिय असलेले के. चंद्रशेखर राव यांनी एका प्रचारसभेत आपण जर कॉंग्रेस पक्षाला मत देणार असाल तर राज्यात शेतकऱ्यांसाठी मृत्यूची घंटा वाजलीच म्हणून समजा, असे सांगितले. यावरून कॉंग्रेस विरोध समजू शकतो. शेवटी तेलंगणातील स्थितीत असा कसा बदल झाला. कॉंग्रेस या ठिकाणी बीआरएसच्या विरुद्ध एवढ्या सक्षमपणे पुढे कशी आली. लक्षात ठेवा, 13 वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर केसीआर 2014 मध्ये मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. अर्थात त्यांचे सरकार दहा वर्षांपासून असले तरी डळमळीत वाटत आहे. जवळपास सर्वच निवडणूक पूर्व विश्लेषण,
सर्वेक्षणात बीआरएसच्या तुलनेत कॉंग्रेस पक्षाचा विस्तार होत असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेस या ठिकाणी भाजपला मागे टाकत असल्याचे दिसत आहे आणि त्याकडे नवा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. हा बदल कसा झाला, हे सांगणे कठीण आहे. मात्र, केसीआरचे राजकीय साम्राज्य ढासळले आहे, असे म्हणणे घाईचे राहू शकते. कारण मतदानाला आणखी एक महिना बाकी आहे.
मतदारांचा मूड अजूनही वेगळाच आहे; परंतु कॉंग्रेसची स्थिती मजबूत होताना दिसत आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसला मोफत योजनांचा लाभ मिळू शकतो आणि त्या बळावरच त्यांना संजीवनी मिळू शकते. बीआरएसविरुद्ध असलेल्या नाराजीचा लाभ हा कॉंग्रेस पक्षाच्या झोळीत पडू शकतो. तसेच बीआरएस भाजपसमवेत ताळमेळ बसवताना दिसत आहे. अर्थात बीआरएस अणि भाजप हे दोन्ही पक्ष हा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करू इच्छित आहे; परंतु या आघाडीवर पक्षाची पिछेहाट होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील सभेत केसीआर हे आपल्याशी मैत्री करू इच्छित आहेत, असा दावा केला.
बीआरएस भाजपसमवेत आघाडी करण्यास तयार आहे. मात्र, त्यास मान्यता दिली नाही, असे पंतप्रधानांनी भाषणातून सांगितले. मात्र असे कोणते घटक कारणीभूत आहे की ते बीआरएसविरुद्ध सक्रिय झाले आहे? सर्वात पहिले म्हणजे बीआरएस आता एकाकी पडली आहे आणि ती आपल्या समर्थकांपासून दूर गेली आहे. एकवेळी रस्त्यावर पावलोपावली हजर राहणारे लोकप्रिय नेते आता चांगल्या बंगल्यात राहात आहेत. आठवा जरा, केसीआर हे आपल्यासाठी चांगले नाहीत, असे राहुल गांधी यांनी तेलंगणच्या जनतेला म्हटले होते, तेव्हा त्यांना रोषाचा सामना करावा लागला होता, पण आता कॉंग्रेससाठी पूरक वातावरण होत आहे.
दुसरीकडे केसीआर यांचा मुलगा अणि मुलगी रामा राव अणि कविता तसेच त्यांचे दोन पुतणे हरीश आणि संतोष हे एकत्र येत राज्याची धुरा सांभाळत आहेत. ही घराणेशाही एवढी स्पष्ट आहे की राहुल गांधी हे स्वत: घराणेशाहीतून आलेले असतानाही त्यांनी तेलंगणातील एका सभेत धाडस दाखवत तेलंगणात एकाच कुटुंबाचे सरकार आहे, असे मत मांडले. अर्थात दोन्ही राजकीय पक्षात टीका करण्याच्या पद्धतीत बराच फरक आहे. कॉंग्रेस पक्षाने कर्नाटक मॉडेल राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षाने सहा हमी योजनांची घोषणा केली आहे.
सत्तेत आल्यानंतर या सहा हमी योजना लागू केल्या जाणार आहेत. त्यात मोफत बस प्रवास, मासिक पेन्शन, महिला मतदारांना मोफत गॅस आणि कृषी अंशदान यासारख्या योजनांचा समावेश आहे. त्याचवेळी बीआरएसने शेतकऱ्यांसाठी नवीन सिंचन योजना आणि रोखीने मदत देण्याची घोषणा केली. पण त्याचा श्रीमंत शेतकरी आणि उच्च वर्गातील लोकांना अधिक फायदा होणार असल्याचे संकेत मिळाले. अर्थात ही मंडळी केसीआरचा कणा राहिलेली आहे. एकंदरीतच कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांना खेचत बीआरएसच्या पायाखालचा सत्तेचा गालीचा खेचून घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत विविध मुद्द्यांव्यतिरिक्त तेलंगणाच्या राजकारणात बदलाची सतत राहणारी इच्छा हे एक वैशिष्ट्य आहे.
1980 च्या दशकात कॉंग्रेसची राजवट बिघडू लागली तेव्हा तेलगू जनतेने अभिनेते एन. टी. रामाराव यांची निवड केली. जेव्हा एनटीआर यांची दिशा भरकटली गेली, तेव्हा सत्तांत्तर झाले आणि त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी सत्तेची कमान सांभाळली. मात्र, त्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले, तेव्हा कॉंग्रेसने वायएसआर रेड्डींना पाठबळ दिले. मात्र, त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेसला आपला गड राखता आला नाही आणि केसीआरने ही पोकळी भरून काढली. आता केसीआर आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असतील तर मतदार कॉंग्रेस पक्षाला परत सत्तेत आणण्याची तयारी करत आहेत. आतापर्यंचा ट्रेंड पाहता मतदारांना कॉंग्रेसच्या रूपाने एक पर्याय मिळाल्याचे दिसून येत आहे. अजून एक महिना आहे. कारण तेलंगणात 30 नोव्हेंबरला मतदान होणार असून त्याची मतमोजणी 3 डिसेंबरला होईल. असे म्हटले जाते, की राजकारणात एक आठवडा देखील खूप असतो. पुढे काहीही होवो, सध्या तेलंगणाचे राजकारण वेगळ्या वळणावर पोहोचले आहे.
– के. श्रीनिवासन