काही वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेटचा शोध लागला, तेव्हा हा शोध उत्क्रांतीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल असे कुणाला वाटलेही नसेल. सुरुवातीपासूनच या शोधाचा व्यावसायिक पैलू विकसित होण्यास सुरुवात झाल्यामुळे इंटरनेट आधी विकसित देशांची मक्तेदारी बनून राहिला होता. परंतु हळूहळू विकसनशील देशांच्या दिशेने इंटरनेटची पावले वळली आणि आता जगभरात इंटरनेट हा मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट तळहातावर आले आणि मग त्याच्या विकासाचा वेग शतगुणित झाला. जागतिक इंटरनेट दिनाच्या निमित्ताने इंटरनेटविश्वातील बदलत्या युगाचा रंजक आढावा…
संपूर्ण जगभरात 29 ऑक्टोबर हा दिवस जागतिक इंटरनेट दिन म्हणून साजरा होतो. सुमारे 54 वर्षांपूर्वी म्हणजेच 29 ऑक्टोबर 1969 रोजी इंटरनेटवरील पहिला संदेश ऑनलाइन पाठवला गेला. आज संपूर्ण जगभरातील बहुतांश लोकसंख्येचे इंटरनेटशिवाय पानही हलत नाही, अशी स्थिती आहे. इंटरनेटने जग जवळ आणले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडणाऱ्या घटनेची माहिती एका क्लिकद्वारे झटक्यात मिळू लागली आहे. पूर्वी एखाद्या गोष्टीचे संदर्भ शोधायचे असतील तर त्यासाठी पुस्तकांची संग्रहालये पालथी घालून पुस्तकांचा शोध घ्यावा लागे आणि त्यातील माहिती वाचून संदर्भ गोळा करावे लागत असत. आज इंटरनेटमुळे तशी परिस्थिती राहिलेली नाही. कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर इंटरनेटवरील मायाजालात त्याविषयी नोंदी टाकल्या की क्षणात माहितीचा साठा उपलब्ध होतो. इंटरनेटमुळे माहितीचा अजस्त्र स्रोत तर खुला झाला आहेच; पण, त्याचबरोबर मित्र-मैत्रिणींचे जाळे विणून ते अधिक घट्ट करण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ लागला आहे.
संगणकाचा शोध लागल्यानंतर 1960च्या दशकापर्यंत मोठ्या प्रयोगशाळा आणि संरक्षण संस्थामध्ये संगणक वापरण्यात येत होते. संगणकाच्या मदतीने अवघड आकडेमोड करणे आणि महत्त्वाची माहिती पाठवणे हा हेतू होता. मात्र, या माहितीचे हस्तांतर करणे जिकीरीचे होऊ लागले तेव्हा दूरवरच्या संगणकांना एका दुव्यात जोडणाऱ्या नेटवर्कची गरज भासू लागली. या गरजेतूनच अमेरिकेत 1969 मध्ये “अर्पानेट’चा उगम झाला. यातून सुरुवातीला लॉस एंजल्सचे कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि स्टॅन्फर्ड संशोधन संस्था यांचे संगणक जोडण्यात आले. यातच पुढे, उराह विद्यापीठही समाविष्ट करण्यात आले. “अर्पानेट’च्या कार्यक्षमतेपुढे, या नेटवर्कमधील सदस्यांची संख्या वाढू लागली. दर वीस दिवसाला एक याप्रमाणे 1981 पर्यंत “अर्पानेट’नेटवर्कची संख्या 213 पर्यंत पोहोचली. अर्पानेट म्हणूनच इंटरनेटची सुरुवात मानण्यात येते.
“अर्पानेट’च्या कार्यक्षमतेपुढे इतरही देशांमध्ये अशाच तंत्रज्ञानाची गरज भासू लागली. 1974 मध्ये ब्रिटनमधील शिणि आणि संशोधन संस्थांना जोडण्यासाठी डएठउपशीं चा उदय झाला. यालाच नंतर “जानेट’ असेही संबोधण्यात येऊ लागले. यानंतर “कॉम्प्युसर्व्ह’ “अमेरिका ऑनलाइन’ फिडोनट अशी अनेक नेटवर्क उदयास आली आणि यातून पर्सनल कॉम्प्युटरपर्यंत नेटवर्कची सुविधा मिळण्यास सरुवात झाली. हीच इंटरनेटच्या उगमाची सुरुवात मानण्यात येऊ लागली.
अनेक नेटवर्क उदयाला आल्यामुळे या सर्व नेटवर्कस्ना एकत्रित ठेवणारे “नेटवर्क’असण्याची गरज निर्माण झाली. अशा प्रकाररचे नेटवर्क म्हणजे इंटरनेट अशी संज्ञा 1974 मध्ये प्रथम वापरण्यात आली. 1980 च्या सरुवातीला “अर्पानेट’आणि”एनएसएफ नेट’ यांना जोडण्यात आले आणि या नेटवर्कला “इंटरनेट’ असे संबोधण्यात आले. याच तंत्रज्ञानाचा विकास होत इंटरनेट जगभर पोहोचले आणि 1992 पर्यंत इंटरनेट प्रत्येक सामान्य नागरिकांच्या बोटापर्यंत पोहोचले.
इंटरनेटच्या उदयाबरोबरच असंख्य वेबसाइट उदयास आल्या. यामध्ये सर्च इंजिन्सनी आघाडी घेतली. सुरुवातीला 1995 मध्ये याहू हे सर्चइंजिन अल्पावधितच लोकप्रिय झाले होते. मात्र, 1999 मध्ये गूगलचा जन्म झाला आणि सर्चइंजिनवर गूगलचे साम्राज्य सुरु झाले. आजमितीला या व्यवसायातील 80 टक्क्यांपेक्षा अधिक व्यवसाय एकट्या गूगलचा आहे. या शिवाय मायक्रोसॉफ्टचे “रेडीफ, बिंगो, अशी अनेक सर्च इंजिन उपलब्ध आहेत. मात्र सहज आणि सोपी शैली, प्रचंड वेग यामुळे गूगलची लोकप्रियता सर्वोच्च स्थानी आहे. केवळ माहितीच्या हस्तांतरासाठी उदय झालेले इंटरनेट आता एक मोठा व्यवसाय बनले आहे. सर्वाधिक लोक वापरत असणारी आणि सहज उपलब्ध असणारी ही जगातील एकमेव सेवा आहे.
या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवे “माहिती तंत्रज्ञान युग’ अवतरले आहे. आधुनिक जगातील अर्थव्यवस्थांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये इंटरनेटने किती मोलाचे योगदान दिले आहे याची अनेक उत्तम उदाहरणे आपल्याच आजूबाजूला सापडतील. वैयक्तिक आयुष्यात बॅंकिंग आणि अन्य आर्थिक व्यवहारांमध्ये आलेली सुलभता-पारदर्शकता आपण दररोज अनुभवत आहोत. हातातील स्मार्टफोनच्या साहाय्याने क्षणार्धात पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा इंटरनेटमुळेच उपलब्ध झाली. कोविड काळात तर इंटरनेटने अक्षरशः देवदूताची भूमिका बजावली. इंटरनेटमुळे आपले जीवनव्यवहार, भावनिक आयुष्य, शिक्षण, आरोग्य, अर्थकारण, समाजकारण, कृषीव्यवस्था अशा सर्वांना गुंफण घातली आहे.
इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची सुरवात 1980 च्या दशकात झाली. या प्रवासात इंटरनेट अनेक चांगल्या-वाईट अनुभवातून गेले. ई-कॉ सारख्या वाढत्या व्यापाराच्या संकल्पनेमुळे इंटरनेट वरदान मानण्यात येऊ लागले. “डॉट कॉम बबल’ फुटल्यानंतर मात्र सर्वांनी इंटरनेटच्या नावानेच खडे फोडले होते; पण आज इंटरनेटमुळेच “जग हे एक खेडे’ हा जागतिकीकरणाचा मूलमंत्र खऱ्या अर्थाने मूर्त रुपात आला आहे.
आज इंटरनेटच्या जगात एक मिनिट म्हणजेच 60 सेंकदात सर्वकाही बदलते. प्रत्येक मिनिटाला फक्त अमेरिकेत 380 नवे संकेतस्थळ सुरू होतात. फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सऍपवर एका मिनिटात 71.6 दशलक्ष मेसेज फॉरवर्ड होतात. दर मिनिटाला ट्विटवर 87,500 ट्विट पोस्ट होतात. यूट्यूबही यात मागे नाही. यूट्यूबवरचे सक्रिय यूजर्स हे दर मिनिटाला पाचशे तासांचे नवीन व्हिडिओ अपलोड करतात. इन्स्टाग्रामवर दर मिनिटाला 6,95,000 स्टोरी शेअर होते. दर मिनिटाला गूगलवर 3.8 दशलक्ष सर्चिंग केले जाते. त्याचवेळी दर मिनिटाला फेसबुक, यूट्यूब आणि ऍमेझॉन या शब्दांचा सर्वाधिक सर्च होतो. आता कमाईकडे जाऊ. गूगल हे एका मिनिटात 1,28,234 डॉलर कमावते. जीमेलचा विचार केला तर एका मिनिटात 232.4 दशलक्षपेक्षा अधिक ईमेल जगाच्या कानाकोपऱ्यात पाठविले जातात.
याहू आणि बिंगसारख्या सर्च इंजिनवर एका मिनिटात अनुक्रमे 3,52,134 तसेच 5,74,026 सर्च होते. याहू देखील एका मिनिटात 9452 डॉलर कमावते. एका मिनिटात 7812 डॉलर बिंग कमावते. 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर दर मिनिटाला 28,000 ग्राहकांनी त्याच्या ऍपवर काही ना काही पाहिल्याचे सिद्ध झाले आहे. एका मिनिटात डेटिंग ऍप टिंडरवर 20 लाख प्रोफाइल स्वाइप केले जाते. तसेच लोकांनी सोशल मीडियाकडे केवळ टाइमपास म्हणून पाहत नाहीत तर प्रोफेशनल नेटवर्किंगही करतात. म्हणून लिंकडेनवर दर मिनिटाला 9,132 नवीन कनेक्शन जोडले जातात. इंटरनेटवर किती शॉपिंग होते, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. कारण 2021 मध्ये दर मिनिटाला इंटरनेटवर 16 लाख डॉलर खर्च झाले आहेत.
असा हा इंटरनेटचा प्रवास रंजक आणि क्रांतिकारी आहे. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात काही टप्पे असे मानले जातात, ज्यांनी मानवाचे आयुष्यच बदलून टाकले. उदाहरणार्थ, आगीचा शोध लागल्यानंतर मानवाचे आयुष्य बदलून गेले. चाकाचा शोध लागल्यानंतर जीवनाला गती मिळाली. कुंभाराच्या चाकाच्या रूपाने पहिले यंत्र मानवाने निर्माण केले, असे मानले जाते. पण जेव्हा इंटरनेटचा शोध लागला, तेव्हा हा शोध उत्क्रांतीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल असे कुणाला वाटलेही नसेल. सुरुवातीपासूनच या शोधाचा व्यावसायिक पैलू विकसित होण्यास सुरुवात झाल्यामुळे इंटरनेट आधी विकसित देशांची मक्तेदारी बनून राहिला होता. परंतु हळूहळू विकसनशील देशांच्या दिशेने इंटरनेटची पावले वळली आणि आता जगभरात इंटरनेट हा मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण पैलू बनून गेला आहे.
सुरुवातीपासून इंटरनेटचा वापर केवळ इंग्रजी भाषेतून होत होता. अनेक वर्षे इंग्रजी हेच इंटरनेटचे माध्यम राहिले. परंतु आता अनेक भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करता येतो. अगदी स्थानिक, प्रादेशिक भाषांमध्येही इंटरनेट उपलब्ध झाले आहे. त्यामुळे हे माध्यम वापरणाऱ्यांची संख्या अचानक अनेक पटींनी वाढली आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या वापराने “सर्च’ अधिकाधिक स्थानिककेंद्री झाला आहे. म्हणजेच “ग्लोबल’ होता-होता “सर्च’ आता “लोकल’ होऊ लागला आहे. भारतात स्मार्टफोनधारकांची वाढती संख्या हे त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. याला एका अर्थाने इंटरनेटचे लोकशाहीकरण म्हणावे लागेल. आता येत्या काळात स्पीच रेकग्निशन तंत्रावर आधारित सर्च प्रोग्राम विकसित करण्यावर गूगलसह सर्वच टेक्नो कंपन्यांनी भर दिला आहे. इंटरनेटच्या वापरासाठी विशिष्ट भाषेचे ज्ञान असण्याची अपरिहार्यता यामुळे संपुष्टात येत आहे.
येणाऱ्या काळात इंटरनेटचा वेग कैकपटींनी वाढेल यात शंकाच नाही. पण त्याचबरोबर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर इंटरनेट सेवेत कोणकोणते बदल होतील हे पाहणे रंजक ठरणार आहे. चॅटजीपीटीसारख्या तंत्रज्ञानाने इंटरनेटच्या आधाराने बौद्धिक क्षमता न वापरताही काम कसे करता येते याची झलक दाखवली आहे. याकडे क्रांती म्हणून पाहिले जात असले तरी इंटरनेटच्या माध्यमातून मानवी मेंदूची विचारशक्ती, कल्पनाशक्ती, ग्रहणशक्ती कमकुवत करण्याची रणनीती तर आखली जात नाहीये ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे इंटरनेटच्या पोतडीतून येणाऱ्या काळात कोणते आविष्कार जन्माला येतात यापेक्षाही त्यांच्या वापराबाबतचे तारतम्य आणि विवेक न बाळगल्यास होणाऱ्या हानीची चर्चा आज अधिक प्रमाणात होत आहे.
– महेश कोळी