नौदलाच्या मागील निशाणांवर आठकोनांचे अष्टकोन होते. तेच या नवीन नौदलीय निशाणावरही आहे. फक्त यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून त्याचा उल्लेख करत त्याला शिवरायांच्या राजमुद्रेशी निगडीत केलं. कदाचित त्याला काही विवक्षित राजकीय संदर्भ असेल. काही का असेना, पण भारतीय नौदलाला आता नवीन निशाण मिळालं आहे. यापुढे प्रत्येक नाविक, भलेही तो अधिकारी असो किंवा समुद्री सैनिक, सर्वांना या निशाणाचा सन्मान आणि मान मर्यादा राखण्यासाठी प्राण अर्पण करण्यासाठी सदैव तयार राहावं लागेल, हेच सैनिकांचं कर्तव्य असतं.
भारतीय नौदलाच्या नव्या निशाणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेच्या छटा आहेत, हे प्रसारमाध्यमांमध्ये ठळकरित्या आल्यानंतर सर्व महाराष्ट्रात आनंदाची लाट उसळली. नुकतेच भारतीय नौदलाच्या नव्या निशाण हस्तांतराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही अंशांवर आधारित या बातमीला जनतेनीही अत्यानंदाने, हसतहसत स्वीकारलं, नव्हे डोक्यावर घेतलं. भारतीय नौदल छत्रपतींच्या प्रेरणेनुसार कार्यरत असतं हे आधुनिक भारतीय नौदलाच्या पायाभरणीतील छत्रपतींच्या योगदानाची प्रशंसा करतांना पंतप्रधानांनी आवर्जून सांगितलं. दोन सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत ही शाबासी व्हायरल होत होती. मात्र त्यानंतर यावर टीकाटिप्पणी सुरू झाली.
आधुनिक नौदल स्थापनेतील छत्रपतींच्या योगदानचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी दक्षिण भारतातील प्राचीन नौदलांची उदाहरण देखील द्यायला हवं होतं. कारण भारतीय नौदलाच्या इतिहासात त्यांचाही मोठा वाटा आहे अशा आशयाच्या बातम्या समोर येऊ लागल्या.
ब्रिटिशकालीन मनोवृत्तीचं प्रतीक असलेल्या “ब्लड रेड क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज’ला काढून टाकण्यात आलेल्या झेंड्याच्या रूपात भारतीय नौदलाला नवे निशाण मिळालं आहे. याचा आराखडा अतिशय सरळ, सोपा आहे. असं असतानाही यात काही तरी कमतरता आहे. हे संपूर्ण वाटत नाही. यात अजून प्रेरणादायक आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी हव्या होत्या हे माझ्या काही निवृत्त नाविक मित्रांचं मत पडलं. पण बदल काय हवा हे मात्र ते सांगू शकले नाहीत.
नौदलाच्या नवीन निशाणाच्या आराखड्याने नौदल मुख्यालय, संरक्षण मंत्रालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि विवक्षित मंत्री, पंतप्रधान कार्यालय या चढत्या उतरत्या भाजणीमधून अनेकदा ये-जा केली असेल. त्यानंतरच त्याला अंतिम रूप मिळालं असेल यात शंकाच नाही. पण या प्रशासकीय सोपनातील खडतर प्रवासात, त्या आराखड्यावर कुठल्याही प्रकारची विपरीत टिप्पणी झाली नाही यावरून ती सर्व संमतीने मंजूर झाली आहे असं म्हटल्यास ते वावगं होणार नाही. या आराखड्याला गुप्त न राखता,आजी माजी वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या मतांचा आणि सूचनांचाही अंतर्भाव यात करण्यात आला असेल हे नक्की. कारण ती पूर्वापार चालत आलेली रीत आहे.
या नवीन निशाणातून आम्ही परकीय राजवटीची शेवटची खूण काढून टाकली आहे. अशी खूण जी भारतीय नौदलाने मागील 75 वर्षे त्यांच्या निशाणाच्या उरावर बाळगली होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने आजपासून भारतीय नौदलाच नवीन निशाण मोठ्या डौलानी समुद्र व आकाशात फडकेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. ते पुढे म्हणाले, छत्रपतींच्या आरमाराने शत्रूला सळो की पळो करून सोडले होत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली असता, मराठ्यांच्या जहाजांमुळे त्यांच्या उरात धडकी भरत असे.
मराठ्यांच्या आरमारामुळे झालेल्या विध्वंसा फलस्वरूप इंग्रजांनी हिंदुस्तानच्या समुद्री ताकदीला नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलला आणि त्यांची जहाजी वाहतूक आणि व्यापारावर लक्षणीय कठोर प्रतिबंध घालण्यासाठी ब्रिटिश संसदेत अनेक कायदे पारित केलेत. हा महाराजांचा दरारा होता. भारतीय श्रद्धास्थान असलेला तिरंगा, नौदलाच्या नवीन निशाणाच्या डावीकडील वरच्या भागात, शुभ्र धवल बॅक ग्राउंडवर स्थित आहे. निशाणाच्या मध्यावर सोनेरी, नेव्ही ब्ल्यू रंगाचा अष्टकोन चितारला आहे. त्याचे आठ कोन, आठही दिशांना असलेल्या भारताच्या नौदलीय प्रभावाला उजागर करतात.
भारतीय राज्यघटनेतील चार डोक्यांचा सिंह त्या अष्टकोनात एक शिल्डवर विराजमान झालेला असून त्याखाली वरुण या समुद्री देवाची सदैव कृपादृष्टी राहो, हे वैदिक वचन उद्धृत केलं आहे. जुन्या निशाणात या सिंहाखाली साखळी बेड्या गुंडाळलेला समुद्री नांगर होता; पण नवीन निशाणातील अँकरमध्ये त्या साखळी बेड्या नाहीत. हा सुटा अँकर, भारतीय नौदलाचं स्थैर्य, खंबीरपणा आणि स्वातंत्र्य दर्शवतो.
असं म्हणतात की नवीन निशाणातील दुहेरी बॉर्डर असलेल्या या अष्टकोनाची संकल्पना आधुनिक भारतीय नौदलाचे जनक आणि समुद्री ताकदीप्रती दूरदृष्टी बाळगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरून घेण्यात आली आहे. त्यांच्या याच विचारांमुळे तत्कालीन युरोपियन नौदल, त्यांची अथक प्रशंसा करत असत. भारतीय नौदलाचं हे नवीन निशाण तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने 15 ऑगस्ट 2001 रोजी जारी केलेल्या नौदलीय निशाणासारखंच आहे. या निशाणातील रंगसंगती बाबतीत आलेल्या आक्षेपांना ग्राह्य धरून डॉ. मनमोहन सिंग सरकारने हे निशाण 2004 मध्ये खारीज करून जुनं निशाण परत एकदा लागू केलं.
हिंदुस्थानच्या नाविक इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाविक कारवायांचे योगदान हे अनन्यसाधारण आहे. त्यांच्या आरमाराने गाजवलेले कर्तृत्व, त्याचा आवका आणि परिणाम लक्षणीय आहेत. त्याचबरोबर इसवी सनपूर्व 200 ते इसवी सनानंतर 200 वर्षांपर्यंतच्या चारशे वर्षांत सातवाहन राजप्रमुखही दख्खनच्या पठारावर राज्य करताना रोमशी समुद्रमार्गे व्यापार उदिम करत असत. जहाजांचे ठसे असलेली त्यांची सोन्याची नाणी दक्षिण मेडीटरेनियन पुरातत्त्व जागांमध्ये सापडली आहेत. तिकडे चोला राजघराण्याचा नाविक इतिहास अजूनच उज्ज्वल आहे.
बंगाल उपसागराची ओळख चोला तलाव अशी होती. कारण चोला राजे वारंवार त्याचा वापर आपल्या समुद्री आक्रमणासाठी करत असत. चीनच्या तत्कालीन मिंग राज्यकर्त्यांच्या तीन समुद्री आक्रमणांना चोला राजांनी मलाक्का सामुद्रधूनीतच खारीज केलं होतं, अशी वंदता आहे. जहाजांमध्ये स्वार होऊन जाणाऱ्या चोला सैन्याने श्रीलंका, मालदीव, मलेशिया, इंडोनेशिया आणि दक्षिण थायलंडपर्यंत क्षेत्र काबीज केलं होतं. त्यांचे अवशेष या देशांत मंदिर आणि इतर इमारतींच्या स्वरूपात आजही उभे आहेत. या व्यतिरिक्त विजयनगरच्या राजे, मेसोपोटेमियाशी व्यापार करत असत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने पंतप्रधानांनी याचाही उल्लेख आपल्या भाषणात करायला हवा होता, असं या अधिकाऱ्यांचं प्रांजळ मत आहे.
सध्या प्रचलित असलेल्या विचारसरणीविरुद्ध मत मांडलं असल्यामुळे बऱ्याच लोकांना माझे विचार पटणार नाहीत. तसेच मला तीव्र टीकास्त्रालाही सामोरं जावं लागेल याची मला पूर्ण कल्पना आहे. पण माझ्या मते, नौदलाच्या मागील निशाणांवर आठकोनांचे अष्टकोन होते. तेच या नवीन नौदलीय निशाणावरही आहे. फक्त यावेळी पंतप्रधानांनी आवर्जून त्याचा उल्लेख करत त्याला शिवरायांच्या राजमुद्रेशी निगडीत केलं. कदाचित त्याला काही विवक्षित राजकीय संदर्भ असेल. पण प्रसार माध्यमांनी त्याला आपल्या पद्धतीने सादर केले. पंतप्रधानांच्या प्रसारमाध्यमातील वक्तव्याचा संदर्भ देत उपमुख्यमंत्र्यांनी या विचारांना लगेच पुढील चालना दिली आणि वादाला सुरुवात झाली.
भारतीय नौदलाला आता नवीन निशाण मिळालं आहे. यापुढे प्रत्येक नाविक, भलेही तो अधिकारी असो किंवा समुद्री सैनिक, सर्वांना या निशाणाचा सन्मान आणि मान मर्यादा राखण्यासाठी प्राण अर्पण करण्यासाठी सदैव तयार राहावं लागेल, हेच सैनिकांचं कर्तव्य असतं. नाम, नमक आणि निशाणासाठी जगा आणि त्याच्यासाठीच प्राणार्पण करा.
-कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)